। पुणे । प्रतिनिधी ।
राज्यातील जनतेला फोडाफोडीचे राजकारण आवडले नसून विद्यमान शिंदे सरकार फार काळ टिकणारे नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका विधानाचा समाचार घेतला.
‘बंड करताना थोडाजरी दगा फटका झाला असता तर मी शहीद होण्याचा धोका होता. मी शहीद झालो असतो’, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर पवार यांनी त्यांच्या मनात अशी भीती का यावी? ते राजकीय शहीद झाले असते की खरोखर शहीद झाले असते ते कसं सांगावं? पण राज्यातल्या जनतेला या प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही, असं अजित पवार म्हणाले.
कुणी कुठे कार्यालय काढायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण कार्यालय काढल्यानंतर तिथे लोकसुद्धा भेटायला यायला पाहिजेत. लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे. लोक बघत आहेत. यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी फोडाफोडी केली की जनतेसाठी केली हे जनता ओळखते, असं अजित पवार म्हणाले.