‌दादा, तुमची हद्द झाली! अजित पवारांवर आव्हाडांची टीका

| मुंबई | प्रतिनिधी |

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शरद पवारांपासून सावध करताना ते ही शेवटची निवडणूक म्हणून भावनिक साद घालतील, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत, असे वक्तव्य केले होते. यावरून शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. तुमच्यासोबत काम केल्याची आता लाज वाटतेय, अशी टीका आव्हाडांनी केली आहे.

बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची शाळा घेतली. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने संभ्रमित झालेल्या कार्यकर्त्यांना भावनिक विचार करू नये, असे सांगताना व्यावहारिक गोष्टींना बघा, असा सल्ला अजितदादांनी दिला. आगामी निवडणूक काळात काही लोक भावनिक होतील, माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगतील, पण खरंच ती शेवटची निवडणूक असेल का? हे माहिती नाही, असे वक्तव्य करून अजितदादांनी शरद पवार यांना डिवचलं. त्यांच्या याच विधानावर आव्हाड यांनी तीव्र आक्षेप नोंदवित संताप व्यक्त केला.

बारामतीत कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजित पवार यांनी हद्द ओलांडली. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची याचना करणं हे कितपत योग्य आहे. आपल्या काकांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच, असं विधान करणं हे माणुसकीला शोभणारं आहे का, याचा विचार अजित पवार यांनी करावा, असं आव्हाड म्हणाले. महाराष्ट्राला पण कळेल की, आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघणारा काय माणूस आहे हा, बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील, अशा शब्दात आव्हाडांनी अजित पवार यांचा समाचार घेतला. त्याचवेळी ते शरद पवार आहेत, त्यांचा शेवट वगैरे नाही. ते महाराष्ट्रात अजरामर राहतील. त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान हे अजरामर असेल, अशा शब्दात आव्हाडांनी अजित पवार यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं.

Exit mobile version