ऑस्ट्रोलियात सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताच्या सर्वच प्रतिस्पर्ध्यांना महंमद शमी स्वप्नातही दिसतोय. मुघलांना जसे संताजी धनाजी दिसायचे, तसेच शमी पाकिस्तानी फलंदाजांना दिसतोेय. याचं कारणही तसं आहे. 2022 च्या ऑस्ट्रोलियातील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेच्या संभाव्य विजेत्यांमध्ये सर्वांनी ऑस्ट्रोलियाला पहिली पसंती दिली आहे. ऑस्ट्रोलिया संघ यजमान आहे. आणि जेव्हा शमीने त्यांना सराव सामन्यात सोमवारी 6 चेंडूंत 4 बाकी घेऊन पराभूत केले, त्यावेळी तमाम क्रिकेटविश्व हादरून गेले आहे. शमीच्या तीन यॉर्करनी तिघांना तंबूत पाठविले. हीच खरी डोकेदुखी आहे. सर्वांनी त्याचा धसका घेतला. खरं तर, भारताचा प्रमुख प्रतिस्पर्धी संघ आहे पाकिस्तानचा. भारताशी त्यांचा सामना होणार आहे 23 तारेखला. त्या लढतीसाठी पाकचा प्रमुख फलंदाज बाबर आशर्फ तयार होत आहे. बाबरने आज नेट्समध्ये तब्बल पाऊण तास उसळलेल्या चेंडूवर सराव केला. त्यांचे प्रशिक्षक मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाचे माजी यशस्वी सलामवीर होते. ऑस्ट्रोलियाच्या खेळपट्टीचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांनी बाबर आझमसह सर्व प्रमुख फलंदाजांना आखूड टप्प्यावर चेंडू टाकून खेळायला लावले. याचे मुख्य कारण म्हणजे, बाबर आझमाला हार्दिक पंड्याने अलीकडेच एशिया कप स्पर्धेत आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद केले होते.
शमी हा अचूक टप्प्यावर चेंडू टाकतो. यॉर्कर इतकाच त्याचा आखूड टप्प्याचा चेंडू ही समोरच्या फलंदाजासाठी डोकेदुखी आहे. पाकिस्तानी फलंदाजांची हीच खरी समस्या आहे. ज्याचा लाभ भारतीयांनी एशिया कप स्पर्धेत दुबईला घेतला होता. पाक खेळाडूंनाही भारताविरूद्ध खेळताना नेहमीच दडपण येते. शमीची सहा चेंडूंतील कामगिरी तीही बलाढ्य ऑस्ट्रोलियाविरूद्ध पाक संघाचे मनोधैर्य खच्ची करणारी आहे. याची कल्पना आल्याने त्यांचे प्रशिक्षक हेडन पुढे सरसावले आहेत. त्यांनी सर्वच प्रमुख खेळाडूंना शमी व पंड्या यांच्याविरुद्ध आधी सामना केलेल्या फलंदाजीचा स्वतःच्याच क्लीप पाहण्यास सांगितले आहे. त्यामुळे आज पाकिस्तानी संघ सरावामध्ये आखूड टप्प्याचे चेंडू व ऑर्कर खेळण्यावर भर देताना दिसत होता. भारताचे मात्र मनोधैर्य शमीच्या या अफलातून कामगिरीने उंचवले आहे. के.एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांची बॅटदेखील तळपली आहे. कोहली व दिनेश कार्तिक यांना सूर गवसत असतानाच ते बाद झाले. भारताचा पुढील सराव सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे. शमी या सामन्यातही स्फोटक गोलंदाजी करून आपल्या पुनरागमनाची वर्दी देण्याला उत्सुक आहे. तो दुखापतीमधून सावरल्याने बुमराच्या अनुपरिस्थितीमुळे खचलेल्या भारतीय क्रिकेट संघाला नवसंजीवनी मिळाली आहे. ‘डेथ’ ओव्हर्समध्ये गोलदांजी कोण करणार? या प्रश्नाचे उत्तरही काही अंशी भारताला मिळाले आहे. गोलंदाजीपेक्षाही भारताला काळजी आहे फलंदाजीची. कप्तान रोहित शर्मा व विराट कोहली यांना फलंदाजीचा सूर गवसल्यास तर सोन्याहून पिवळे होईल.