कर्नाळा अभयारण्यातील प्राणी असुरक्षितच

उपाययोजना निष्फळ; महामार्गावर प्राण्यांचे अपघात
पनवेल | साहिल रेळेकर |
पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्यातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करून मुंबई-गोवा महामार्गावर प्राणी येणार नाहीत यासाठी दुतर्फा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. परंतु या उपाययोजाना तांत्रिकदृष्ट्या फोल ठरल्याने पुन्हा एकदा महामार्गावर अपघातात मुक्या प्राण्यांचा जीव जात आहे.
शनिवारी दि.21 ऑगस्ट दुपारी साधारण पावणे बाराच्या दरम्यान अभयारण्य परिसरात एका अज्ञात वाहनाने माकडाला धडक देऊन तिथून निघून गेला. या धडकेत माकड गंभीररित्या जखमी होऊन रस्त्याच्या मधोमध पडून होते. याच दरम्यान पनवेलकडून पेणच्या दिशेने येत असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी पाहिल्यानंतर थांबून माकडाला रस्त्याच्या कडेला नेले आणि वन अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क न होऊ शकल्याने शेवटी कर्नाळा अभयारण्याच्या कार्यालयात गेले असता वन परिक्षेत्र अधिकारी उपलब्ध नसल्याचे समजले. त्यानंतर तेथे उपलब्ध असलेले वन रक्षक राठोड यांना तात्काळ जखमी माकडावर उपचार करण्याची विनंती केली असता सदर जखमी माकडाला पकडण्यासाठीचे साहित्य नसल्याचे सांगितल्याने कर्नाळा अभयारण्यातच प्राणी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.
अभरण्यामधून जाणार्‍या महामार्गाभोवती ध्वनीरोधक लावण्याबरोबरच वानर आणि माकडांना महामार्ग ओलांडण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. महामार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता अभयारण्यातील माकडांना महामार्ग ओलांडून पलिकडे जातांना अपघात होऊ नये म्हणून मंकी लॅडर बांधण्यात आला आहे. माकडांनी देखील या लॅडरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या पुलावरून माकडांना रस्त्याच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूस जाण्यासाठी व सुरक्षितरित्या रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांना मंकी लॅडरच्या साहाय्याने जोडले आहे.
खाद्यपदार्थामुळे जीव गमावतात
महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी माकडांना खाऊ न घालण्याचे आवाहन केले असतानाही काही बेशिस्त नागरिक प्राणीप्रेमाचा आव आणतात आणि रस्तातच गाडी उभी करून माकडांना खाद्यपदार्थ खाऊ घालतात. यामुळे अनेकदा माकडे रस्त्यावर आल्याने त्यांचे अपघात घडून इजा होते तर अनेकदा माकडाचे प्राणही जातात. त्यामुळे अश्या नागरिकांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे जेणेकरून अपघातांचे प्रसंग घडणार नाहीत व वन्यजीव सुरक्षित राहतील.

वनविभागाने महामार्गावर जे प्रवासी प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ टाकतात त्यांच्यावर कारवाई करण्याची वारंवार मागणी होत असतानाही कर्नाळा अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळेच अभयारण्यातील प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.
संतोष ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते)

Exit mobile version