शिंदे गटाला राष्ट्रवादी, काँग्रेसची साथ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. 31 सदस्यपदांसाठी जागांसाठी 91 तर तीन थेट सरपंच पदासाठी 10 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जात दाखल्याच्या वैधता प्रश्नांमुळे कोप्रोली येथील निवडणूकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकत एकमेव सदस्यपदासाठीचा दाखल झालेला अर्ज वगळता अन्य कोणीच अर्ज सादर केलेला नाही. वेश्वी आणि नवेदर नवगाव या दोन प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या ग्रामपंचातीमध्ये विकासकामांच्या जोरावर शेतकरी कामगार पक्षाचा वरचष्मा असल्याने शेकापच्या उमेदवारांविरोधात शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटासह, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा अशा सर्वच पक्षांनी आघाडी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी शिंदे गटाच्या दावणीला बांधली जात असल्याने उलटसुलट चर्चा केली जात आहे.
अलिबाग तालुक्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या वेश्वी ग्रामपंचायतीसह अन्य तीन ग्रामपंचायतीमध्ये लांबणीवर पडलेली निवडणूक जाहीर झालेली आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणूकीत आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने थेट सरपंचपदासाठी माजी सरपंच प्रफुल्ल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी शेकापक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे चिटणीस संदीप घरत आदी उपस्थित होते. प्रफुल्ल पाटील यांच्यासह 5 अर्ज थेट सरपंच पदासाठी तसेच 11 सदस्यपदासाठी 45 अर्ज दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे नवेदर नवगाव मध्ये शेतकरी कामगार पक्षाचीच सत्ता राहिली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये मच्छिमार समाजाने बहिष्कार घातल्याने गेले तीन वर्षे निवडणूक झाली नव्हती. मात्र यंदा 15 वर्षांनी पहिल्यांदाच नवेदर नवगाव मध्ये निवडणूक होत आहे. एवढी वर्षे प्रशासन असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये शेकापक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत. आ. जयंत पाटील यांचे विशेष प्रेम नवगाववर असल्याने कोळी समाजाच्या प्रश्नांवर जयंत पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठविला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी 5 तर 11 सदस्यपदांसाठी 45 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.