पेन्शनसाठी निवृत्त कर्मचार्यांचे उपोषण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य निवृत्त कर्मचार्यांचे थकविलेले निवृत्ती वेतन हा त्यांचा हक्क आहे. त्यांचे निवृत्ती वेतन पुन्हा सुरु करण्यासाठी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करुन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या अधिवेशनात विधीमंडळात प्रश्न उपस्थित करुन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिले.
अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य निवृत्त कर्मचार्यांचे गेल्या 31 महिन्यांपासून थकविलेले निवृत्ती वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) संघटनेच्या वतीने अलिबाग येथे सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषण कर्त्यांची आज आ. जयंत पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पेणचे माजी आमदार धैर्यशिल पाटील, वरसोली ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश घरत, नगरसेवक अजय झुंजारराव यांच्यासह संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश चोगले, सचिव जलदीप तांडेल व कार्याध्यक्ष मोरेश्वर हाडके व महिला अध्यक्षा राजश्री बंदरी आदी उपस्थित होते.
आ. जयंत पाटील यांनी उपोषण कर्त्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, जेव्हा जात प्रमाणपत्र देण्यात आले तेंव्हा जात पडताळणीची सुविधा नव्हती. जात प्रमाणपत्र हे वर्ग एकच्या अधिकार्यांनीच दिलेले आहे. त्यामुळे खोटे असू शकत नाही. येत्या विधिमंडळाच्या अधिवेशात आपण सभागृहात निवृत्त अधिकार्यांच्या प्रश्नावर देखील चर्चा करू. तसेच इतर आमदारांसोबत घेऊन यावर मार्ग काढु असे आश्वासन त्यांनी दिले. काळजी करु नका, शंभरटक्के काम होईल. आंदोलन उभे करणे सोपे आहे मागे घेणे सोपे नाही असे सांगतानाच तुम्ही सरकारची सेवा केलेली आहे. जिल्हाधिकारी स्तरावर हा प्रश्न सुटू शकत नाही, यासाठी सभागृहातच लढावे लागेल असेही जयंत पाटील यांनी यावेळी नमुद केले.
यावेळी आंदोलकांनी जयंत पाटील यांच्यासोबत कैफियत मांडताना जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणीही अधिकारी भेटायला आले नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. या उपोषणामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष संदेश चोगले, सचिव जलदीप तांडेल व कार्याध्यक्ष मोरेश्वर हाडके व महिला अध्यक्षा सौ. राजश्री बंदरी यांच्या नेतृत्वाखाली सेवेत असलेले सुभाष भोबू, देवानंद भोळेभावी, वासंती वेताळ, मीनाक्षी झेेंडेकर, वसंत बंदरी, बाळोजी निगुडकर, महानंदा मलव, मच्छिंद्र सिद्धी, परशुराम कोळी, गोविंद खारगांवकर, शिवदास मेस्त्री, गीतांजली भाटे, विनायक सोडेकर, सदानंद मुंबईकर, चंद्रकांत कोळी,गणेश कोळी, वंदना शिने, दामोदर कोळी, चंद्रभान रामजी, यशवंत अमृते, गजानन टिवळेकर, हरिश्चंद्र पाटील, दत्ताराम कोळी, उत्तरा भोईर, अनिल टिवळेकर, सुर्यकांत गणतांडेल, शिवा चोगले, राजेंद्र वाटकरे असे एकूण 29 कर्मचारी बंधू भगिनी आमरण उपोषणाला बसले आहेत.