हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांकडून संताप व्यक्त
| उरण | प्रतिनिधी |
गेली 38 वर्षे शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नसल्याने प्रशासनाचा निषेध करत शेवा कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीएच्या कामगार वसाहतीला लागून असलेल्या जसखार व फुंडे येथील जमिनीचा ताबा घेणार असल्याचा दावा केला आहे. विस्थापित ग्रामस्थांकडून उरण येथील हनुमान मंदिरामध्ये शुक्रवारी प्रजासत्ताकदिनी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी येत्या 4 फेब्रुवारी रोजी जमिनीचा ताबा घेऊन घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील हनुमान मंदिरात झालेल्या विस्थापितांनी घेतलेल्या बैठकीत केंद्रीय बंदर मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी दि.15 जानेवारी 2023 रोजी जेएनपीए (जेएनपीटी)च्या कामगार वसाहतीला लागून असलेल्या जसखार व फुंडे येथील जमिनीवर शेवा कोळीवाडा गावातील 256 कुटुंबांच्या पुनर्वसनाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार पुनर्वसनाच्या कामासाठी जेएनपीटी (जेएनपीए)ने दि.3 जानेवारी रोजी पत्राने जिल्हाधिकारी रायगड यांना याबाबत कल्पना दिली होती. जिल्हाधिकारी यांनी दि.26 जानेवारीपूर्वी नवीन जमिनीचे गाव नमुना क्रमांक, सातबारा तयार करुन देण्याचे कबूल केले होते. मात्र, अद्यापही ते काम न झाल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.
उरण तालुक्यातील जेएनपीए प्रकल्पासाठी शेवा कोळीवाडा गावातील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जमीन संपादन करताना जुना शेवा कोळीवाडा गावातील ग्रामस्थांना उरण तालुक्यातील बोरीपाखाडी येथे हनुमान कोळीवाडा येथील संक्रमण शिबिरात राहण्यासाठी जागा दिली होती. गेली 38 वर्षे संक्रमण शिबिरात राहूनदेखील अद्यापही शासनाकडून योग्य राहण्याची सोय न केल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हनुमान कोळीवाडा गावातील सर्व घरांना वाळवी लागली आहे. ही घरे राहण्यालायक नसल्याचा अहवाल टाटा संस्थेच्या वतीने शासनाला दिला होता. मात्र, याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गेली 38 वर्षे हा प्रश्न सुटला नसून, तो मुद्दामून रेंगाळत ठेवल्याने ग्रामस्थांचे योग्य जागी पुनर्वसन झाले नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या बैठकीत 4 फेब्रुवारी रोजी जेएनपीएच्या कामगार वसाहतीला लागून असलेल्या जसखार व फुंडे येथील जमिनीचा ताबा घेऊन घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उरणचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.