| रसायनी | वार्ताहर |
कोणातील ग्रामीण भागात भात कापणी झाल्यापासून पाऊस पडेपर्यंत घाटमाथ्यावरील विविध नागरिक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोकणात दाखल होत असतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनासारखी महामारी निर्माण झाल्यामुळे नंदि बैल काळबाह्य झाल्याचे दिसून आले. हवेत गारवा निर्माण होवून थंडी पडताच रसायनी पाताळगंगा परिसरातील नजीकच्या ग्रामीण भागात पुन्हा नंदीबैलांचे आगमन झाल्याचे पहावयास मिळाले. ग्रामीण भागात विविध ठिकाणी पोतराज, गोंधळी, नंदीबैल येत आहे.
नंदीबैल आणणारे याच व्यवसायावर आपला उदर- निर्वाह करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पिढ्यानपिढ्यापासून करीत असलेला व्यवसाय खंडीत होवू नये शिवाय पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. त्यांना पाहण्यासाठी लहानथोर, महिलावर्ग गर्दी करुन आपले गाऱ्हाणे मांडतात. यातच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाल्याने महिला वर्गांसह नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून येते. नंदीबैलाला उत्तम सजविण्यात येत असून पायात घुंगरु, खांद्यवर शाळ आणि विविध वेश भुषानीं सजविण्यात आल्यामुळे महिला वर्गांमध्ये नंदीबैल पाहून उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.