अटल सेतू थेट अलिबागला जोडणार

कोस्टल कॉरिडॉर उभारणीच्या हालचाली सुरु

| रायगड | सुयोग आंग्रे |

देशातील सर्वात लांब असलेला सागरी सेतू, म्हणजेच ‘अटल सेतू’चे अलिबागशी जोडणी करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि अलिबाग यांच्यातील प्रवासाचा कालावधी अवघ्या दीड तासांवर येईल. मुंबई महानगर प्रदेशाच्या क्षेत्राच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला विस्तारीकरणासाठी खुणावणाऱ्या अलिबाग तालुक्याच्या किनारपट्टीवरून थेट कोकणच्या दिशेने जाणारा कोस्टल कॉरिडॉर सरकारच्या पटलावर आला आहे.यासाठी रेवस करंजा सागरी पूल महत्वाचा दुवा ठरणार आहे. भविष्याचा विचार करून कोस्टल कॉरिडॉर उभारणी सरकारने फास्ट ट्रॅकवर घेतली आहे.

राज्य सरकारने ‘अटल सेतू’ला थेट अलिबागशी जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सिडकोने या प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए आणि कोकण विभाग यांच्याशी अखंड रस्ते संपर्क प्रस्थापित करणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. उल्वे परिसरात सध्या सुमारे 7 किलोमीटर लांबीचा सहा-पदरी किनारी रस्ता उभारला जात आहे. या मार्गाच्या पुढील टप्प्यात, द्रोणागिरीमार्गे या रस्त्याला रेवस-करंजा पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ‘अटल सेतू’च्याही पुढे विस्तारणारा एक थेट किनारी मार्ग तयार होणार आहे. कांदळवनांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने, या मार्गाच्या काही विशिष्ट भागांमध्ये उन्नत रस्ते उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 1,600 कोटी रुपये इतका आहे.

या प्रकल्पाचा विस्तार करण्याच्या कामासाठी येणारा खर्च मात्र 2,500 ते 4,000 कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. एकदा का रेवस-करंजा पुलाशी जोडणी पूर्ण झाली, की मुंबई आणि नवी मुंबई थेट रस्त्यामार्गे अलिबागशी आणि त्याही पुढे जाऊन संपूर्ण कोकण प्रदेशाशी जोडली जाईल. यामुळे फेरी सेवांवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. पर्यटन क्षेत्राबरोबरच रायगड जिल्ह्यात औद्योगिक विकास, रियल इस्टेटच्या व्यवसायाला गती मिळणार आहे. कोस्टल कॉरिडॉरची निर्मितीमुले अलिबागसह कोकणातील सर्व जिल्ह्यांचा मुंबईकडे जाण्याचा प्रवास सुखकर आणि वेळ आणि इंधनाची बचत करणारा ठरणार आहे.

रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगत असणाऱ्या तालुक्यांमधील गावांचा समावेश एमएमआरडीए क्षेत्रात करण्यात आला आहे. यामध्ये पनवेल, उरण, पेण, अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यातील गावांचा समावेश आहे. एकीकडे कोस्टल कॉरिडॉरचे काम उरण तालुक्यात सुरु असताना दुसरीकडे एमएसआयडीसी मार्फत अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील किनारपट्टी भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाला गती आली आहे. अलिबाग शहरानजीकच्या बायपास पासून मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अलिबाग ते मुरुड जाणारा रस्ता रुंदीकरण करण्याचे काम दिवसरात्र सुरु आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हाच रस्ता कोस्टल कॉरिडॉरला जोडला जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version