आरटीओ, स्थानिक प्रशासन सुस्त
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरात गेल्या काही वर्षांत पर्यटनाचा आलेख कमालीचा उंचावला आहे. मात्र, पर्यटनाच्या या झगमगाटात शहराची अंतर्गत वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, तिला अवैध आणि मनमानी कारभाराचे ग्रहण लागले आहे. श्रीवर्धनमधील रिक्षा वाहतुकीचा पार बोजवारा उडाला असून, प्रादेशिक परिवहन विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप आता जाहीरपणे होऊ लागला आहे.
श्रीवर्धन शहरात धावणाऱ्या अनेक रिक्षांकडे आवश्यक कागदपत्रे, वैध परवाने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहनाची फिटनेस तपासणी केलेली नाही, अशी खात्रीलायक चर्चा आहे. नियमांनुसार रिक्षात ठरावीक प्रवासी बसवणे बंधनकारक असताना, अनेक चालक केवळ आर्थिक फायद्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक करत आहेत. त्यामध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुर्दैवाने एखादा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पर्यटन हंगामात विकेंडला शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. अशातच, काही बेशिस्त रिक्षा चालकांकडून मुख्य बाजारपेठ, गर्दीचे रस्ते आणि चौकाचौकांमध्ये मनमानी पद्धतीने रस्त्याच्या मधोमध किंवा कडेला रिक्षा पार्क केल्या जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे असह्य झाले असून, तासन् तास वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच, स्थानिक प्रवाशांना डावलून पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळण्याचे प्रकारही वाढले असून, यामुळे श्रीवर्धनच्या पर्यटन नगरीच्या प्रतिमेला मोठा तडा जात आहे.
श्रीवर्धनमध्ये ज्या दिवशी आरटीओ अधिकाऱ्यांचा कॅम्प किंवा तपासणी मोहीम असते, त्या दिवशी शहरातील चित्र अत्यंत आश्चर्यकारक असते. तपासणीच्या भीतीने आणि कारवाई टाळण्यासाठी, कागदपत्रे नसलेल्या आणि नियमबाह्य चालणाऱ्या अनेक रिक्षा त्या दिवशी हेतुपुरस्सर बंद ठेवल्या जातात किंवा रस्त्यावरून गायब केल्या जातात. हा लपंडाव गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, आरटीओच्या मोहिमेची आगाऊ माहिती या अवैध चालकांपर्यंत पोहोचते कशी? की हा केवळ एक फार्स आहे? अशी शंका आता नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे.







