डायलेसीस मशीनसाठी चित्रलेखा पाटील यांचाही हातभार
| मुरुड | वार्ताहर |
किडनी मुख्यतः गोड पदार्थ सेवन केल्यामुळे खराब होते. मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढणे, ही चिंतेची बाब आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-अधिक होणे हे मधुमेहाचे प्रमुख लक्षण आहे. म्हणून गोड पदार्थांचे अतिसेवन टाळा, असे कळकळीचे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.
मुरुड येथील संजीवनी आरोग्य सेवा संस्थेत अक्षय्या फाऊंडेशन व चित्रलेखा पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून दिलेल्या हिमो डायलेसिस मशीन, पॉझिटिव्ह पेशंट कॅबीन व अॅम्ब्युलन्स शेडचे उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. लहाने बोलत होते.
मधुमेहींना सल्ला देताना डॉ. लहाने यांनी सांगितले की, जिलेबी, आईसक्रीम खाताना असे रुग्ण मधुमेहाची अर्धी गोळी जास्त खात असले तरी रक्तात गोड पदार्थ अवघ्या 30 सेकंदात मिसळले जातात व गोळी दोन तासांनंतर तिचा परिणाम दाखवते. मुरुडकरांनी समुद्रावर दोन फेर्या मारल्या तरी या रोगापासून स्वतःला वाचवू शकाल, असा सल्ला त्यांनी दिला. डायलिसिस सेंटरमधील रुग्णाजवळ दोन तास बसले तरी त्या विकाराची दाहकता कळेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मुरुड डायलेसीस सेंटरसाठी अनेक मदतीचे हात पुढे येत असल्याचे सांगून आगामी काळात स्वतःची जागा उपलब्ध झाली तर चार ते पाच तालुक्यांतील रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ देता येईल. याव्यतिरिक्त नेत्र चिकित्सा व अन्य उपचारांसाठी ऑपरेशन थिएटर उभारण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.
स्वामी समर्थ मठाच्या संस्थापिका तृषा भोसले यांनी संजीवनी संस्थेला एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यासोबत रुग्णांना लागणारी न्याहरी व औषधांचीदेखील तजवीज करण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर डॉ. तात्याराव लहाने, समर्थ मठाच्या संस्थापिका तृषा भोसले, मनोज भगत, विभाग प्रमुख डॉ. मकबुल कोकाटे, कार्याध्यक्ष विजय सुर्वे, तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार अमित पुरी, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, डॉ. विक्रमजीत पाडोळे, राशीद फहीम, प्रमोद भायदे, मंगेश दांडेकर, चंद्रकांत अपराध, अजित गुरव, कीर्ती शहा, डॉ. पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना विजय सुर्वे यांनी डॉ. लहाने यांच्या प्रेरणेतून संजीवनी आरोग्य केंद्र कार्यरत असून, या टीम वर्कमुळे पाच तालुक्यांतील 32 रुग्णांना एमजीपीद्वारे डायलेसीस सेवा सेवाभावी आरोग्य सेवकांकडून दिली जात असून, या संस्थेचे जास्तीत जास्त नागरिकांनी सभासद होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी डॉ. कोकाटे, नायब तहसीलदार अमित पुरी, दिलावर महाडकर, तृषा भोसले, मनोज भगत आदींनी आपले विचार व्यक्त करीत जेव्हा जेव्हा मदतीची गरज भासेल, तेव्हा ती करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती उमरोटकर यांनी, तर आभार चंद्रकांत अपराध यांनी व्यक्त केले.