75 दिवसांत 24 राज्यांतून करणार 21,000 कि.मी.चा प्रवास
| मुरूड – जंजिरा | वार्ताहर |
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथील प्रसाद चौलकर आणि पनवेल येथील अभिजित सिंग कोहली हे दोन बाईकस्वार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करीत आहेत. मोटारसायकलवर भारतभ्रमण करून देशाच्या गौरवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे जगाला दर्शन घडवण्यासाठी हे दोघे बाईकस्वार देशव्यापी बाईक राइडसाठी निघाले आहेत. या परिक्रमेत ‘रस्ता सुरक्षा’सहित ‘एक भारत श्रेष्ठ भारत’, ‘अतुल्य भारत’ आणि ‘देखो अपना देश’ इत्यादींचादेखील प्रामुख्याने प्रचार आणि प्रसार केला जात आहे.
सदरील 75 दिवसांची परिक्रमा एकूण तीन टप्प्यात करण्यात येत आहे. काश्मीर ते कन्याकुमारी तसेच गुजरात ते पश्चिम बंगालपर्यंत अशा एकूण 24 राज्यांतून तब्बल 65 दिवस राइड केली गेली, ज्यामध्ये आतापर्यंत 18,000 किलोमीटरचा प्रवास या दोन बाईकस्वारांनी पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, या विक्रमी बाईक राईडची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच हावर्ड वर्ल्ड रेकॉर्ड लंडन या संस्थांद्वारे घेण्यात आली.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत केली जाणारी ही देशातील सर्वात मोठी आणि अनोखी मोटारसायकल राइड असून, भारत पर्यटन दिल्ली, पर्यटन मंत्रालय-भारत सरकार यांनी या परिक्रमेची विषेश दखल घेऊन सहकार्य केले आहे. या विक्रमी बाईक राइडसाठी जिल्हाधिकारी-रायगड, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझेशन (डब्ल्यूएचओ), कोलॅबरेटिव्ह सेंटर फॉर इमरजेंसी अँड ट्रॉमा-एम्स हॉस्पिटल, दिल्ली तसेच इंडिया यूएस इमरजेंसी मेडिसिन कौन्सिल यांचे विशेष योगदान मिळाले आहे.
बाईक राईडर श्री प्रसाद चौलकर यांनी याआधी शेजारी देश नेपाळ, भूतान तसेच भारतातील 24 राज्यांमध्ये विविध सामाजिक संदेश घेऊन बाईक राइड केलेली आहे. त्यांनी कराटे या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करून तीन आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. त्यांच्या क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल जिल्हा परिषद रायगडतर्फे त्यांना ’रायगड भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दुसरे बाईकस्वार अभिजित सिंग कोहली हे एक अनुभवी बाईक रायडर आणि युट्यूब ब्लॉगर असून, सोशल मीडियावर सुरक्षित प्रवास तसेच बाईक राइडसाठी गरजेच्या साधनांविषयी ते माहिती देत असतात. बाईक राइडसंबंधी विविध विक्रम त्यांच्या नावावर असून, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तीन वेळा नाव नोंदले गेले आहे.
परिक्रमेचे पर्व पहिले
परिक्रमेचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2021 मध्ये एकूण 12 राज्ये आणि 7000 किलोमीटरचा प्रवास करून पूर्ण केला गेला. या राइडदरम्यान भारतीय चलनावर छापलेल्या ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव जगापुढे आणण्याचा हा एक प्रयत्न होता.
पर्व दुसरे
परिक्रमेचा दुसरा टप्पा गाठत असताना भारतीय राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ बाईक राइड केली गेली. राष्ट्रगीतामध्ये नमूद केलेल्या प्रदेशांना तसेच नद्यांना या परिक्रमेत भेट दिली गेली. या पर्वात एकूण 18 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांत 42 दिवस बाईक राइड करून 11,000 किलोमीटर एवढे अंतर कापले गेले.
पर्व तिसरे
परिक्रमेच्या तिसर्या आणि शेवटच्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार असून, एकूण 10 दिवसांत ही बाईक राइड पूर्ण केली जाईल. तिसरे पर्व भारतीय स्वातंत्र्य सेनानींना समर्पित असणार आहे. महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतिस्थळापासून बाईक राइडची सुरुवात होऊन नवी दिल्ली येथे या परिक्रमेची समाप्ती होईल.