आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल

| ठाणे | प्रतिनिधी |

आता ते सगळ्यांना डोस देत सुटलेत; तुला पाडीन, तुला पाडीन करत आहेत, मग तुम्हाला तुमच्या पोराला निवडून का आणला नाही? लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता? ज्या बापाने मला घडवलं, त्या बापाचा हात सोडताना हृदयात जराही कालवाकालव झाली नाही? असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील सभेत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

1991 साली अजित पवारांना महाराष्ट्रात कोण ओळखत होतं? त्या अजित पवारांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि संसदेत पाठवलं. त्यानंतर वारंवार सत्तेच्या वर्तुळात ठेवलं, चार वेळा उपमुख्यमंत्री बनवलं. संघटनेचे पद का घेतले नाही, कधीतरी मला पक्षाचे अध्यक्ष करा, मला पक्ष वाढवायचाय, असं का म्हटलं नाही. तुम्हाला केवळ सत्ता हवी होती. त्या सत्तेसाठी तुम्ही शरद पवारांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि पक्ष स्वत: ताब्यात घेतला, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

आव्हाड म्हणाले, ज्या मातोश्रीने आईसारखं प्रेम दिलं, आपलेपणा दाखवला ती मातोश्री फोडण्याचंच काम केलं. हे दोन्ही गद्दार या महाराष्ट्राला कधीही आवडणार नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहास दोन गद्दारी ओळखल्या जातात. खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ. यांच्या अवलादींना महाराष्ट्राने कधीही ओळख दिली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ या गद्दार लोकांना कायमचं संपवू टाका.

Exit mobile version