साईडपट्ट्या, मोऱ्यांची कामे निकृष्ट दर्जाची
| कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गोवे, मुठवली ते शिरवली दोन महिन्यांपूर्वी बनविण्यात आलेल्या नवीन रस्त्याचे तीनतेरा वाजले असून, हा नवीन बनविण्यात आलेला रस्ता पूर्णपणे खचला आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्याही निकृष्ट दर्जाच्या बनविण्यात आल्या आहेत, हे एकंदरीत परिस्थितीवरुन लक्षात येत आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गामधील गोवे गावाकडे जाणारा 500 मीटरचा रस्ताही चिखलात गेला आहे. यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेंतर्गत 4 कोटी 58 लाख 40 हजार रुपयांचा निधी खर्च करून गोवे ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई-गोवा महामार्गापासून गोवे, मुठवली ते शिरवली मार्गी खांब महामार्गापर्यंत पाच किलोमीटर रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले. परंतु, बनविण्यात आलेल्या रस्त्याचे काम, साईडपट्ट्यांचे काम, तसेच मोऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, प्रवासी नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया गोवे ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजना ही ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी आणि आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना असून, यामुळे ग्रामीण भागातील चांगले रस्ते बाजारपेठेला जोडले जातात, यामुळे उत्पादनाची विक्री करणे सोपे जाते. लोकांना शिक्षण, आरोग्य सेवा व इतर सामाजिक सुविधा मिळण्यासाठी मदत होते. वरील कारणामुळे चांगले व रुंद रस्ते व्हावे यासाठी गोवे येथील शेतकऱ्यांनी विनामूल्य भातशेतीची जागा रस्त्यासाठी दिली. शिवाय, शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला असणारी असंख्य हापूस आंब्याची झाडे तोडण्यात आली. एवढेच नव्हे तर, चांगल्या रस्त्यासाठी फार्म हाऊसवाल्यांनीही मोफत जागा दिली. परंतु, ठेकेदारांनी मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्यामुळे याचा नाहक त्रास ग्रामस्थांना भोगावा लागणार आहे. कारण, महिसदरा नदीच्या बाजूने गेलेला रस्ता पूर्णपणे खचला आहे. तसेच नदीच्या बाजूचा भराव संरक्षण भिंतीसाठी खोदण्यात आला होता. परंतु त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही, यामुळे नदीला खांडी जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकतो. तसेच ठेकेदारांनी मोऱ्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला संपूर्ण रस्ता, साईडपट्ट्या व मोऱ्यांचे काम सुस्थितीत करून देण्याच्या सूचना देण्यात याव्यात. हे काम व्यवस्थित पूर्ण झाल्याशिवाय ग्रामपंचायतीने ठेकेदाराला रस्त्याचे बिल वर्ग करू नये.
ग्रामस्थ मंडळ,
गोवे