वादळी वार्यासह पावसाचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात पुढील पाच दिवस वादळी वार्यासह अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दि. 14 ते 18 मार्चपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वार्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील पंधरवड्यात दुसर्यांदा अवकाळीचा फटका शेतकर्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याचा अंदाज आहे. 15 मार्च रोजी धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 16 मार्च रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 16 मार्च रोजी महाराष्ट्रात कोकणासह सर्वत्रच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातदेखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.