राज्यात अवकाळीचा फटका ; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान


| विदर्भ | वृत्तसंस्था |

विदर्भासह खान्देशात सोमवारी रात्री पाऊस आणि गारपिटी झाली. रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी सरकारला नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे. विदर्भात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला आहे. काढणीला आलेला हरभरा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वादळी वाऱ्याने गहू जमीनदोस्त झाला आहे.

अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, चांदुर रेल्वे, दर्यापूर तालुक्यात हरभरा, गहू, तूर ,कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यास अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. सोलापूरमधील बार्शीत तालुक्यातील श्रीपत पिंपरीत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात द्राक्षबाग भुईसपाट झाल्या. यामुळे शेतकऱ्यांचे 18 ते 20 लाखांचे नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये द्राक्ष ऐन काढणीला आलेला होता. परंतु द्राक्ष बागेला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बाग आडवी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी सुद्धा प्रचंड नुकसान झाले होते.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसला. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. एकीकडे यंदा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचे संकट असताना झालेल्या गारपिटीमुळे कांदा पिकासह इतर शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. जळगाव तालुक्यात अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळदार पाऊस तसेच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

Exit mobile version