भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव
| खरोशी | वार्ताहर|
पेण तालुका म्हणजे भाताचे कोठार समजले जाते. परंतू शेती व्यवसाय सध्या निसर्गाच्या असमतोल वातावरणातील बदलामुळे कठीण झाले आहे. त्यातच तालुक्यातील खारेपाट भागात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वर्षभर केलेले काबाडकष्ट वाया जाणार या चिंतेने बळीराजा पूर्णता हताश झाला आहे. खारेपाट भागातून मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन होत असून शेतकऱ्यांना भाताचे पीक घेताना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागते. लावणीपासून ते मळणीपर्यंत शेतीवर वेगवेगळ्या प्रकारचे रोगाचा प्रादुर्भाव होतो.
यंदा पावसाने उशिरा केलेली सुरुवात भातलागवड झाल्यापासून जोरदार पावसाने फिरवलेली पाठ त्यातच गेल्या काही दिवसांत पावसाने घेतलेली उसंत या साऱ्याचा परिणाम भातशेतीवर झाला असून या भागांतील भातरोपांवर करपा रोगाची लागण झाली असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यातच सध्या भातपिकांना कणसे करपा रोगाची मोठी लागण असून हे पीक करपून संपूर्ण शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या रोगामुळे भातरोपावरील कणसासहीत संपूर्ण पाती मुळासकट जळून जाते. या रोगावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते, मात्र काहींना कीटकनाशकांची फवारणी करूनही हा रोग आटोक्यात आणता आला नाही, तर काहींच्या हातून वेळ निघून जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या ना त्या कारणाने शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. याचा परिणाम भात उत्पादनावर होत आहे.
तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पंचायत समिती कृषी व तालुका कृषी विभागाने प्रतिबंधात्मक औषध फवारणी व औषध उपलब्ध करून द्यावे. तसेच, शेतकऱ्यांशी संपर्क साधून, चर्चा करून भातपिकाची पाहणी करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
खारेपाट भागातील बेनवले हद्दीतील शेतीवर जाऊन पाहणी केली असता रोपांच्या पातीवर करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने पाती लाल पडत चालली आहे. सदर रोप तपासणीसाठी पाठवले आहे.
सागर वाडकर, पेण कृषी अधिकारी