आयपीएलसाठी इंग्लंड बोर्डाचा पुढाकार
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावात इंडियन प्रीमिअर लीग 2025 एका आठवड्यासाठी स्थगित करावी लागली आहे. आयपीएलचे 16 सामने अजून शिल्लक असून त्याबाबतचा निर्णय परिस्थितीवर अवलंबून आहे. यापूर्वीही 4 वेळा आयपीएल स्थगित करावी लागली आणि दुसरीकडे हलवली गेली होती. त्यामुळे बीसीसीआयला या परिस्थितीचा अनुभव आहे. बीसीसीआयकडे उर्वरित सामने खेळवण्यासाठी संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आदी पर्याय आहेत. त्यात इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही मदतीची तयारी दर्शवली आहे. परंतु, बीसीसीआय ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी भारतातील 4 शहरांची चाचपणी करत आहेत.
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातली धर्मशाला येथे गुरुवारी झालेली लढत भारत-पाकिस्तान युद्धामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर दोन्ही देशांतील खेळाडूंना विशेष वंदे भारत ट्रेनने दिल्लीत सुखरूप पोहोचवले गेले. परदेशी खेळाडूंनाही त्यांच्या मायदेशात पाठवण्याची सोय बीसीसीआयने केली आहे. बसीसीआयकडे अंतिम निर्णयासाठी आठवड्याचा कालावधी आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड सांगितले की, आम्ही बीसीसीआयला उर्वरित आयपीएलचे सामने खेळवण्यासाठी मदत करायला तयार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय भारतातील दक्षिण किंवा पूर्व भारतातील शहरांचा विचार करू शकते. बीसीसीआयचे त्यादृष्टीने काम सुरू आहे. बीसीसीआयला आयपीएल 2025चे उर्वरित सामने भारतातच खेळवायचे असून चार शहरांचा विचार करत असल्यची माहिती मिळत आहे.
‘या’ चार शहरांत सामन्यांची शक्यता
अशा बाबींसाठी एक आठवडा खूप मोठा कालावधी असतो. बोर्ड योजना आखत आहे. पुढील आठवड्यात लीग पुन्हा सुरू झाल्यास कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्ये उर्वरित आयपीएल सामने खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. सीमेवरील परिस्थिती सुधारल्यास मूळ ठिकाणी देखील सामने होऊ शकतात, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.