। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या थळ येथील आरसीएफ कंपनीच्या नावाने सध्या बोंबाबोंब सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीमध्ये शटडाऊन सुरु आहे. या शटडाऊनमुळे युरिया खताचे उत्पादन थांबविण्यात आले आहे. खरीप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसच बाकी आहेत. या हंगामात शेतकर्यांना आवश्यक खताचा पुरवठा आरसीएफ कंपनी वेळेवर करणार का, असा सवाल जनमानसातून उमटत आहे. कारखाना जिल्ह्यात असताना जिल्ह्यातच खताची वाट पाहावी लागते, याबाबत शेतकर्यांकडून संताप व्यक्त होत आहे. मागणीनुसार कंपनीकडून खताचा पुरवठा होत नसल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स नावाची भारत सरकारची खतनिर्मिती करणारी कंपनी अलिबाग तालुक्यातील थळ या ठिकाणी गेल्या 45 वर्षांपूर्वी उभारण्यात आली. या कंपनीमार्फत युरिया खताची निर्मिती केली जाते. शेतकर्यांना भातपिकासह इतर पिकांसाठी आवश्यक खत उपलब्ध करण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जातो.
रायगड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख 430 हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात तीन लाख 11 हजार 648 खातेदार आहेत. पावसावर अवलंबून असणार्या पाण्यावर 95 टक्के शेतकरी शेती केली जाते. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरी तीन हजार 129 हून अधिक मि.मी. पाऊस पडतो. खरीप हंगामात भातपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या कालावधीत खताची मागणीदेखील शेतकर्यांकडून केली जाते. आरसीएफ कंपनीकडून निर्मिती होत असलेले युरिया खत पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे खरीप हंगामात युरिया खताला प्रचंड मागणी आहे.
दरवर्षी आरसीएफ कंपनीकडे युरिया खताची मागणी केली जाते. मागील वर्षी 2024 -2025 मध्ये 13 हजार मेट्रिक टन इतक्या युरिया खताची मागणी कृषी विभागाने केली होती. मात्र, आरसीएफ कंपनीने फक्त 12 हजार 14 मेट्रिक टनच खताचा पुरवठा केला. कंपनीकडून एक हजार 986 मेट्रिक टन खताचा पुरवठा कमी करण्यात आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मागणीनुसार खताचा पुरवठा करण्यास कंपनी उदासीन ठरल्याचे या आकडेवारीनुसार दिसून आले आहे. परिणामी, खताच्या तुटवड्यामुळे शेतकर्यांना मागणीप्रमाणे खत उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकर्यांकडून संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातच खतनिर्मितीचा कारखाना असताना जिल्ह्यातीलच शेतकर्यांना आवश्यक पुरवठा होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा 2025-26 या वर्षासाठी 11 हजार 910 मेट्रिक टन खताचे आवंटन करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यातील पाली व पेण याठिकाणी प्रत्येकी 50 मेट्रिक टन खत पुरवठा केला आहे. पालीमध्ये 665 मेट्रिक टन आणि दोन हजार 270 मेट्रिक टन अशी मागणी असताना फक्त 50-50 मेट्रिक टनच खताचा पुरवठा करण्यात आला आहे.
अलिबाग तालुक्यातील थळ येथे खतनिर्मिती करणारे आरसीएफ प्रकल्पामुळे खताचा पुरवठा वेळेवर व मागणीनुसार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकर्यांना आहे. मात्र, ही अपेक्षा कंपनीकडून फेल ठरल्याचे दिसून आले आहे. भातशेतीसह इतर पिकांच्या उत्पादनवाढीला चालना देण्यासाठी खताचा पुरवठा कंपनीकडून केला जात असल्याचा गाजावाजा आरसीएफ कंपनी कायमच करीत आली आहे. मात्र, कंपनी प्रशासनाकडून मागणीनुसार पुरवठा केला जात नसल्याचे हे शासनाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
सध्या कंपनीमध्ये शटडाऊन सुरू आहे. देखभाल दुरुस्तीचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे कंपनीतील युरिया खताचे उत्पादन थांबविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आधीच मागणीप्रमाणे खतपुरवठा करण्यात अपयशी ठरलेली आरसीएफ कंपनी यंदाही शेतकर्यांना आवश्यक तेवढ्या खताचा पुरवठा वेळेवर करेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कंपनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून शटडाऊन सुुरू आहे. आठवड्याभरात ते पूर्ण होईल. सध्या खत उत्पादनाचा एक प्लांट बंद आहे. कृषी विभाग जेवढी खताची मागणी करते, तेवढा पुरवठा केला जातो. खत पुरवठाबाबत मार्केटिंग विभागाकडे अधिक माहिती उपलब्ध होईल.
– राकेश कवळे, जनसंपर्क अधिकारी, आरसीएफ
खरीप हंगाम एप्रिल ते सप्टेंबर हा खरिप हंगाम असतो. कृषी विभागाकडून मिळालेल्या अलोकेशननुसार खताचा पुरवठा करण्यात आला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत शंभर टक्के खताचा पुरवठा केला होता. सप्टेंबरपर्यंत सुमारे 510 मेट्रिक टन अधिक खताचा पुरवठा केला होता. यंदादेखील खताचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे.
– अमर गडवे, मार्केटिंग विभाग प्रमुख, आरसीएफ