युद्धविरामासाठी लोटांगण
|नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशवादी तळांवर हल्ले करत ते उद्ध्वस्त केले. त्यानंतर बिथरलेल्या पाकड्यांनी भारतावर सातत्याने ड्रोन हल्ले करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय सैन्याने पाकचे सर्व हल्ले परतवून लावत चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष शिगेला जाऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, बलाढ्य भारतापुढे आपला निभाव लागणे अशक्य असल्याचे शहाणपण उशिराने पाकला सुचले. त्यामुळे युद्धाची खुमखुमी असणाऱ्या पाकिस्तानची अखेर जिरली असून, त्यांनी भारतापुढे युद्धविरामासाठी लोटांगण घातले आहे. भारताने युद्धविरामाची घोषणा शनिवारी सायंकाळी केली.
याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्करी कारवायांचे महासंचालकांनी (डीजीएमओ) शनिवारी दुपारी 3.35 वाजता भारतीय डीजीएमओंना फोनवरुन संपर्क केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी जमीन, हवाई आणि समुद्रातून हल्ले केले जाणार नाहीत. गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशांनी या कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लष्करी कारवायांचे महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा बोलतील, असे ते म्हणाले.
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढला होता. दरम्यान, दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या नियंत्रणात असलेल्या जम्मू काश्मीर येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते. भारतातील अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्याला भारतीय लष्कराने वेळोवेळी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यादरम्यान आज भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली आणि दोन्ही देशांचे शस्त्रविरामाच्या मुद्द्यावर एकमत झाल्याचे पाहायला मिळाले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे.
भारत आणि पाकिस्तानात युद्धविरामासंदर्भात एकमत झालं आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत दिली. याच संदर्भात आता संरक्षण मंत्रालयानेही पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे की, भारत आणि पाकिस्तानात समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती झाली आहे. या पत्रकार परिषदेत लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी, हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि नौदलाचे कमोडोर रघु आर नायर उपस्थित होते.
कमोडोर रघु आर नायर म्हणाले की, समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यासाठी सहमती झाली आहे. हिंदुस्थानी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला या कराराचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ते म्हणाले आहेत की, पाकिस्तानच्या कृत्याला कडक प्रत्युत्तर देण्यात आले आहे, जर तणाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला, तर त्यांना निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल.
दरम्यान, कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, भारतीय सशस्त्र दल देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज, सतर्क आणि पूर्णपणे वचनबद्ध आहेत.
12 मे रोजी पुढची फेरी
दुपारी साडे तीनच्या सुमारास पाकिस्तानच्या डीजीएमओंनी भारताच्या डीजीएमओंना फोन केला. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या शस्त्रविरामावर एकमत झाले. त्यानुसार संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांकडून होणारे हल्ले थांबवण्यात आल्याचेही मिस्री यांनी सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये 12 मे म्हणजेच सोमवारी दुपारी 12 वाजता चर्चेची पुढची फेरी होणार आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
भविष्यातील दहशतवादी हल्ले युद्ध समजू
भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरी भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल. त्यानुसार त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. दरम्यान, या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी, चौहान यांनी सिंह यांना सुरक्षेच्या परिस्थितीची माहिती दिली होती.