| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवे गावाकडे जाणारा 500 मिटरचा रस्ता ठेकेदाराच्या अडमुठेपणामुळे रखडला असून तीन ते चार दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्याला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे या मार्गांवरून येणारे जाणारे विद्यार्थी, कामगार वर्ग, प्रवाशी नागरिक यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून यामुळे एखादा मोठा अपघात झाला तर संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल अशी संतप्त प्रतिक्रिया गोवे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा हायवेवरील पुई हद्दीतील महिसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरु आहे. या महामार्गांवरून या पुलाच्या बाजूनी गोवे गावाकडे जाणारा 500 मिटरचा रस्ता मुंबई-गोवा हायवेच्या कामामुळे रखडला आहे. तसेच, पावसाळा जवळ आला तरी गोवे गावाकडे जाणारा रस्ता ठेकेदाराच्या अडमुठे धोरणामुळे अद्याप ही पूर्ण होऊ शकला नाही.
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील चौपदरीकरणाच्या कामाला 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोलाड परिसरातील रस्ता करण्यासाठी ठेकेदाराला जाग आली आहे, तर हे काम कोणत्याही ग्रामस्थांचा विचार न करता ठेकेदाराच्या मनमानीनुसार सुरु आहे. ठेकेदाराच्या मनमानी नुसार रस्त्यावर भराव टाकण्याचे काम सुरु आहे; परंतु या भरावामुळे मुंबई-गोवा महामार्गांवरून गोवे गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. याविषयी गोवे ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. यानंतर हा रस्ता लवकरच लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदार यांनी गोवे ग्रामस्थांना दिले होते. परंतु, पावसाळा सुरु होण्यासाठी 15 ते 20 दिवस शिल्लक राहिले असतांना रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.
मुंबई-गोवा चौपदरीकरणासाठी किती जागा संपादीत करण्यात आली आहे, याची माहिती घेऊन पूर्ण भराव करायला हवा होता. यामुळे मुंबई-गोवा हायवेवरुन असंख्य गावाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला असता. परंतु, नियोजन शुन्य असल्यामुळे लोकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.