। मुंबई । प्रतिनिधी ।
मागील काही दिवसांपासून संबंध महाराष्ट्रात पावसाने धुवांधार बॅटिंग सुरु केली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून राज्यभर पावसाने धुमाकुळ घातला. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असल्याने राज्यात मुसळधार पाऊस होणार अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. त्यानुसार राज्यात दमदार पाऊस झाला आहे.
दरम्यान, आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्यानं राज्यभर पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील 48 तासांत राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 48 तासांत दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तसच घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची संततधार सुरुच आहे. सध्या हा जोर कमी असला तरी येत्या काही वेळात पाऊस होणार आहे. काही भागांत पावसाचा जोर कमी झाला असला तरी आता पुन्हा एकदा पाऊस दमदार एंट्री करण्याची शक्यता आहे.