| नवी मुंबई | प्रतिनिधी |
बेलापूर ते मुंबई असा जलप्रवास करण्याचे नियोजन आखण्यात असून येत्या मंगळवार दि. 7 फेब्रुवारीपासून बेलापूर ते मुंबई वॉटर टॅक्सी प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी दरही आता सर्वसामान्यांना परवडतील असे ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ही मदत होणार आहे. महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून बेलापुर मध्ये जेट्टी बांधून वॉटर टॅक्सीफ सेवा मागील वर्षी करण्यात आली होती. मात्र अधिक भाडे असल्याने या सेवेकडे नागरीकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे याचे भाडे कमी करावे म्हणून आ.मंदा म्हात्रे यांनी अधिवेशनात मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीला यश आले असून आता कमी भाडे आकारून ही सेवा सुरू होत आहे.
टप्प्याटप्प्यात नवी मुंबईहून मुंबई, जेएनपीटी, एलिफंटा, रेवस या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सीफचा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्राथमिक स्वरूपात बेलापूर ते मुंबई असा प्रवास सुरू करण्यात येत आहे. ही वॉटर टॅक्सी 14 ते 50 आसनी क्षमतेची असून याकरिता प्रवाशांना 250-350रुपये मोजावे लागणार आहेत. या सुरू होणार्या वॉटर टॅक्सीला नवी मुंबईकर किती पसंती देतात हे पुढील कालावधीतच स्पष्ट होईल.