जेवणाच्या पार्ट्यांपासून ढेंगेखालून जाण्याची मजल
| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकसभा निवडणूकीत कोण बाजी मारणार यासाठी जिल्ह्यातील गल्ली-बोळातील नाक्यांवर, पारांवर चांगल्याच गप्पा रंगत आहेत. अमूक उमेदवार निवडून येईल, तमूक उमेदवार हरणार असे छातीठोकपणे सांगितले जात आहे. काही ठिकाणी पैजा देखील लावल्या जात असल्याचे दिसून आले. मजेशीर बाब म्हणजे पैज म्हणून जेवणाच्या पार्ट्यांपासून ते ढेंगेखालून जाईन, इथपर्यंत पैज लावणार्यांची मजल गेली आहे. रायगडची जागा कोण जिकंणार हे आता (दि.4) जूनलाच स्पष्ट होणार आहे.
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये इंडिया आघाडीतील शिवसेनेचे (ठाकरे गट) अनंत गीते आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सुनील तटकरे यांच्यामध्येच सरळ लढत होत आहे. (दि.7) मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 60.51 टक्के मतदान झाले आहे. मतदार राजा कोणाच्या पारड्यात झुकते माप टाकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
कोण बाजी मारणार आणि कोण हरणार याबाबतच्या चर्चा आता चांगल्याच रंगत आहेत. मोदी विरोधात सुप्त लाट असल्याने तटकरेंचा पराभव होणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, तटकरे हे जिंकूच शकत नाही ते जिंकले तर मटण-दारुची पार्टी देतो, काही ठिकाणी 500 रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत पैजा लागल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. एकाने तर तटकरे जिंकले तर ढेंगेखालून जाईन अशी पैज लावत गीते निवडून येण्याला पसंती दिली आहे. अलिबाग, पेण, गुहागर, दापोलीमध्ये गीते हे मताधिक्य घेतली, तर महाड, श्रीवर्धनमध्येही गीतेंनाच पसंती असल्याचे बोलले जात आहे. मराठा, ओबीसी, दलीत आणि मुस्लिम मतदार भाजपावर नाराज आहेत. त्यांच्यासोबतच तटकरे गेले आहेत. त्यामुळे हे घटक तटकरेंना धडा शिकवतील असे विषय देखील चांगलेच चघळले जात आहेत. उध्दव ठाकरे, शरद पवार यांचा पक्ष फोडल्याने त्यांच्यामागे प्रचंड सहानभूती असल्याची चर्चा होत आहे. तर काही ठिकाणी मतदारांसाठी पैशाचा पाऊस पाडल्याचेही बोलले जात आहे. महागाई, पक्ष फोडाफोडी, बेरोजगारी, पाण्याचा प्रश्नी सत्ताधारी अपयशी ठरले आहेत, अशा विविध विषयांवर सखोल अध्ययन होताना पहायला मिळत आहे.