मतदारांना प्रलोभने दाखवणार्‍यांनो सावधान

। रायगड । खास प्रतिनिधी ।

काहीच दिवसांनी विधानसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. निवडणूकीच्या कालावधीत मतदारांना विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रलोभने दाखवण्यात येतात. त्यामुळे आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होते. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता आंतर जिल्हा सीमा भागातील तपासणी नाक्यावर काटेकोर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, चोख तपासणी करुनही मतदार संघामध्ये पैशाचे, दारु वाटप केले जाते, तसेच विविध पार्ट्या देखील झोडल्या जातात हि वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.

आगामी विधानसभा सभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सीमेलगतच्या जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसें, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी कायमस्वरुपी चेकपोस्ट सोबतच सीमेवर तात्पुरत्या चेकपोस्टची स्थापना करणे आवश्यक आहे. सर्व जिल्ह्यानी या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे असे यावेळी निश्‍चित करण्यात आले. निवडणुकीवर परिणाम होऊ शकणार्‍या चलन, मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यासाठी प्रभावी उपाययोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणार्‍या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय उपस्थित अधिकार्‍यांनी घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी शेजारच्या राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकार्‍यांनी संपूर्ण समन्वयासाठी सहमती दर्शवली. ग्रामीण भागात तसेच सागरी मार्गाने होणाया वाहतुकीची प्रत्येक टप्प्यावर कसून तपासणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सर्व सीमा भागात प्रमुख रस्त्यांसह आतील लहान मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नमूद केले.

सहभागी सर्व जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणूक आचार संहिता काळात केलेल्या उपाययोजना आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची माहिती सादर केली. यावेळी सीमाभागातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version