भास्कररावांनीच कुणबी समाजाचा अपमान केला

खा. सुनील तटकरे यांचा पलटवार
राज्यशासनाच्या विकास निधीवरून रंगले राजकारण
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
आमचे मार्गदर्शक आ.भास्कर जाधव यांनी राज्याशासनाच्यावतीने कुणबी समाजोन्नती संघासाठी देण्यात आलेल्या 5 कोटीच्या निधीबाबत जे राजकीय भाष्य केले आहे, ते अत्यंत दुदैवी असून, याद्वारे भास्कररावांनी कुणबी समाजाचा अपमान केलाचे प्रतिपादन खा. सुनील तटकरे यांनी केले आहे. दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांनी पाच कोटीचे आमिष दाखवून तटकरे यांनी कुणबी समाजातील नेत्यांना आपल्याकडे वळवल्याचे विधान केले होते. याबाबत तटकरे म्हणाले, प्रत्येक पक्षप्रवेश हे आमिष दाखवून केले जाते, अशी भूमिका शिवसेनेतून राष्ट्रवादी व राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधवांनी मांडणे, हे हास्यास्पद आहे. रायगड-रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा कुणबी समाजाला द्यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली असता शिवसेनेने यापूर्वी या मतदारसंघाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली होती.
भास्कर जाधवदेखील या मतदारसंघातून आमदार झाले होते. उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी व महाविकास आघाडीचे नेते घेतील. भास्कर जाधव यांचा सल्ला मात्र आम्ही वेळोवेळी घेऊ, अशी खोचक टीका त्यांनी केली.
तसेच लोकसभेचे अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनामध्ये बहुमताच्या जोरावर जे कृषी व कामगार विधेयक मांडण्यात आले होते. ते सरकार मागे घेणार असून विविध विषयांवर विरोधक म्हणून आम्ही निश्‍चितच प्रभावी भूमिका मांडू, असेही तटकरे यांनी सांगितले.
याशिवाय, दापोली शहरामध्ये आज उदघाटन झालेले जनसंपर्क कार्यालय हे जनसंवादाचे आगामी काळात एक प्रमुख माध्यम झालेले आपल्याला पाहावयास मिळेल. समाजातील विविध घटक येथे आपल्या समस्या मांडतील व जनसेवक या नात्याने मी त्या निश्‍चितच दूर करेन, असा विश्‍वास तटकरे यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, जिल्हा सरचिटणीस शंकर कांगणे आदी उपस्थित होते.

कोकणातील विविध प्रश्‍न या अधिवेशन काळात मार्गी लावण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केले जातील. आम्ही कोकणच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत. – खा. सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस

Exit mobile version