चंद्रकांत ठाणकर यांचे प्रतिपादन
। पेण । वार्ताहर ।
दि.बा.पाटील यांच्यामुळेच दास्तान फाट्याचा संग्राम यशस्वी झाला आणि भूमिपुत्र आपल्याच भूमित राहिला असल्याचे प्रतिपादन आगरी सेना जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर यांनी केले आहे. दास्तान फाट्याचा संग्राम या पोवाड्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जासई येथे गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या दिनकर बाळू पाटील उर्फ दि.बा.पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी, अन्यायग्रस्तांसाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यांना न्याय देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई वसवण्यासाठी उरण, पनवेल, बेलापूर पटट्यातील हजारो एकर जमीन संपादनाचे सरकारने लक्ष ठेवले होते. त्यासाठी तिथल्या कष्टकरी, शेतकर्यांची मशागत करत असलेली जमीन सरकार कवडीमोल भावने विकत घेणार होते. त्याविरोधात 1984 रोजी दि.बा.पाटील यांनी शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी जासई गावाजवळील दास्तान फाट्याजवळ मोठे आंदोलन उभे केले. दि.बा.च्या शौर्याने दास्तान फाट्याचा संग्राम यशस्वी झाला. या आंदोलनाचा संग्राम अजय लिंबाजी पाटील यांनी पोवाडाद्वारे आपणासमोर आणलेला आहे. लक्ष्मी चित्राच्या युटयूब चॅनल तर्फे त्याची अजिता अजय पाटील यांनी याची निर्मिती केली आहे. यामध्ये शिवाजी शिंदे, संजय गावडे, कोंडाजी बोकडे, शैलेंद्र पाटील यांनी उत्तम अभिनय केला आहे. तर गायन जयेश कराळे यांनी केले आहे.