| मुंबई | प्रतिनिधी |
औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी अखेर शनिवारी जाहीर केली. हा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहिल्याने गेली दीड वर्षे निवडणूक लढण्याची तयारी केलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. औरंगाबादचा प्रश्न सुटला असला तरी ठाणे, नाशिक, पालघर आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघांचा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. गेली दीड वर्षे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तयारी सुरू केली होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद सोडण्यास नकार दिल्याने शेवटी भाजपला हट्ट सोडून द्यावा लागला. शिवसेनेच्या ठाकरे गटाने ओबीसी समाजातील चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने भुमरे यांना उमेदवारी देऊन ‘मराठा कार्ड’ खेळले आहे.