165 नागरिकाचे स्थलांतर
| खोपोली | प्रतिनिधी |
इर्शाळवाडीच्या दुर्घटनेने संपुर्ण महाराष्ट्र राज्य हादरून गेला असून या घटनेत अनेकाचे निष्पाप बळी गेल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे, तर या घटनेनंतर सर्व सरकारी यत्रणां खडबडून जागी झाली असता ज्या ठिकाणी दरड पडण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणच्या नागरीकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. खालापूर तालुक्यातील बिडखुर्द गावातील डोंगर भुसभूशीत झाल्याने दरड पडण्याची शक्यता असल्याने बिडखुर्द गावातील 52 कुटुंब स्थलांतर करीत जवळपास 165 नागरिकांना सुखरुप ठिकाणीं हलविण्यात आले आहे. तर, बिडखुर्द गावात असणाऱ्या नागरिकांनी सावध रहा! असे आवाहन तहसिलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.
तालुक्यातील बिडखुर्द गावावर दरड धोकादायक स्थितीत असून गेल्या काही वर्षांपासून रहिवाशांच्या डोक्यावर या दरडीची टांगती तलवार कायम असतानाच अतिवृष्टी काळात इर्शालगडवाडी सारखी दुर्घटना घडू नये यासाठी खालापुरचे तहसिलदार आयुब तांबोळी, खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत, पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर गटविकास अधिकारी रजपूत व अन्य अधीकारी प्रशासनाने यांनी नागरिकांची भेट घेवून सुरक्षितस्थळी व्यवस्था करीत असल्याचा विश्वास दिला. यादरम्यान प्रशासनाच्या अवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यानंतर 52 कुटूंबांतील 165 नागरिकाचे महड येथे स्थलांतर करण्यात आले आहे.
बिडखुर्द गावावर दरड धोकादायक स्थितीत असल्याने येथील नागरिकांची सुरक्षितस्थळी व्यवस्था करुन स्थलांतर करण्यात आले आहे. तर सर्व स्थलांतर नागरिकांची कोणतीही गैरसोय नये, यासाठी अधिकारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच बिडखुर्द गावातील नागरिकांनी सावध रहावे, काय समस्या वाटल्यास त्वरित प्रशासनाला संपर्क करावा.
आयुब तांबोळी, तहसिलदार खालापूर