जनता दारिद्य्र रेषेखाली तरी मोदी विश्‍वगुरु

अनंत गीतेंचा मोदींवर जोरदार निशाणा

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघात गीतेंच्या सभांना जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. उल्का महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात सर्वहारा जन आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड, मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला.

यावेळी अनंत गिते म्हणाले की, भाजपकडून देशात विकासाचा केवळ भ्रम निर्माण केला जात आहे. जाहिरातबाजी करून देशातील जनतेची फसवणूक केली जात आहे. जनतेला मोफत धान्य देण्याची घोषणा केली जात आहे. मोफत अन्नधान्य हा मोहजाळ आहे, जनतेला मोह दाखवला जातो, जस उंदराला खाद्य दाखवून लालच दाखवून पिंजर्‍यात अडकवले जाते. सापळा रचला जातो तसाच हा सापळा सुरु आहे. मासा जसा गळाला लावला जातो, तस काम या देशात सुरु आहे. देशातील 80 कोटी जनता दारिद्य्र रेषेखाली आहे, अन्नासाठी मौताद आहे आणि म्हणे विश्‍वगुरु असा टोला अनंत गीतेंनी मोदींना लगावला.

यावेळी सुभाष देसाई म्हणाले की, 2024 ची लोकसभा निवडणूक भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा घोटाळ्याचा एक डाग ही ज्यांच्यावर नाही असा स्वच्छ चरित्र्याचा लोकप्रतिनिधी संसदेत पाठवा. यावेळी देसाई यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.

उल्का महाजन म्हणाल्या की, देश विघातक वळणावर पोहचला आहे. आपल्याला जगणे मुश्किल होणार आहे. आपल्याला सन्मानाने जगायचे असेल तर इंडिया आघाडीची सत्ता आली पाहिजे. लोकशाही, संविधान आणि आपले हक्क अधिकार वाचवायचे असतील तर भाजपला तडीपार करा, असे आवाहन या सभेत करण्यात आले.

Exit mobile version