। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने भिसे खिंड धोकादायक बनली आहे. सातत्याने या खिंडीत अपघात होत आहेत. रोह्यातून जेट्टीवरून कोळशाने भरलेला ट्रक हा सायंकाळी भिसे खिंडी मार्गे येत असताना अपघाती वळणावर कोळशाने भरलेल्या ट्रकची मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात ट्रक व मोटारसायकल क्रमांक एमएच 06 बीसी 7231 ही खोल दरीत कोसळली. मोटारसायकलस्वार कोळशाच्या ढिगार्याखाली अडकला. या घटनेची माहिती मिळताच मदतकार्य करण्यासाठी डीवायसपी किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजन जगताप व स्थानिक ग्रामस्थ हरीचंद्र तेलंगे, सोपान जांभेकर, किशोरभाई म्हात्रे, साईनाथ धुळे व इतर मदतीसाठी पोहचले. तब्बल दोन तासानंतर मोटारसायकलस्वाराचा मृतदेह कोळशाच्या ढिगार्याखालून काढण्यात आला.
मुसळधार पाऊस व खोल दरी यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते. भिसे खिंडीत वाहतूक कोंडी झाली होती. दोन तासांनी अथक प्रयत्न करून मयत मोटारसायकलस्वारास बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरू झाली.
दरम्यान मनसे नेते हरीचंद्र तेलंगे यांनी भिसे खिंडीत होणारे अपघात यावर चिंता व्यक्त केली. भिसे खिंडीतून होणारी ओव्हरलोड वाहतूक थांबावी, अशी मागणी तेलंगे यांनी केली.