ढिसाळ यंत्रणा उघडकीस, ग्राहकांचा संताप उसळला
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
रेवदंडा परिसरातील नागरिक मागील चार दिवसांपासून बीएसएनएलच्या मोबाईल आणि इंटरनेट सेवेशिवाय अडकले आहेत. पावसामुळे सेवा बंद झाली, पण पाऊस थांबूनही ती अद्याप सुरळीत झालेली नाही. ग्राहकांनी बीएसएनएल अधिकारी आणि वितरकांना वारंवार संपर्क केला, तरी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
पनवेल येथील डीजीएम कार्यालयात कॉल केल्यावरही कुणी फोन उचलत नाही. ही पूर्ण बेपर्वाईची आणि दुर्लक्षाची मनमानी लोकशाहीतील सरकारी सेवेच्या विरोधात आहे. त्यानंतर बीएसएनएलच्या स्थानिक कार्यालयात पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले केबल बॉक्स उघडे, वायरी अस्ताव्यस्त, यंत्रणा खचलेली, आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. ही स्थिती केवळ दुरुस्तीचा नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष देणारी आहे. सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभारामुळे आता लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे की सरकारी अधिकाऱ्यांचे खासगी कंपन्यांशी गुप्त संबंध आहेत का?
‘जागो ग्राहक जागो’ ही केवळ जाहिरात नव्हे, तर आता ती एक आंदोलन बनण्याची वेळ आली आहे. रेवदंड्यासारख्या ग्रामीण भागात सरकारी कंपनी जर नागरिकांची अशी उपेक्षा करत असेल, तर मग कोणाकडे तक्रार करायची? आणि कोणाकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा ठेवायची, असा सवाला नागरिक करीत आहेत.
बीएसएनएलवर विश्वास ठेवला, पण इतकी बेसावध आणि बेपर्वाईची सेवा पाहून आता खासगी कंपनीकडेच वळायला लागेल.
सागर पाटील,
ग्राहक
केवळ बिल भरण्यासाठी वेळेवर मेसेज येतो, पण सेवा देताना कुठे आहेत हे अधिकारी?
नितेश पोवळे,
व्यावसायिक