फोडलेल्या फटाक्यांचा कचरा रस्त्यांवर

| नवी मुंबई । प्रतिनिधी |

दोन वर्ष निर्बंधामध्ये दिवाळी साजरी करावी लागलेल्या नागरीकांनी यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करताना सर्व नियम गुंडाळून ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले. मध्यरात्रीनंतरही फटाक्यांची आतषबाजी व ठणठणाट ऐकायला येत होते. सणाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांमध्ये विविध साहित्य खरेदीचे प्रमाण मोठे असल्याने बाजारपेठा गजबजून गेलेल्या दिसतात. त्यामुळे कच-याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येते.

यंदाच्या दिवाळीच्या कालावधीत वेगवेगळया प्रकारचे फटाके वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कच-यात लक्षणीय भर पडते. त्यामुळे पालिकेने शहरातील मुख्य रस्ते चौक येथील साफसफाईसाठी विशेष स्वच्छता मोहिम राबवली. परंतू मध्यरात्रीपर्यंत बेफाम उत्साहात दिवाळीचा ठणठणाट सुरु असल्याचे चित्र होते. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांच्या कचर्‍याचे ढीग पाहायला मिळाले. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक करणार्‍यांनी मनसोक्त दिवाळी साजरी करुन शहराचे सौंदर्य बिघडवणार्‍यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई शहराला देशात तिसर्‍या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावलौकीक मिळालेला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदशनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दिपावली सणाच्या कालावधीत शहर स्वच्छतेवर अधिक काटेकोर लक्ष देण्यात आलेले होते. लक्ष्मीपूजनाच्या सणानंतर रात्री 11 वाजल्यापासून बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात स्वच्छतेची विशेष मोहीम (दि. 25) पहाटे 3 वाजेपर्यंत राबविण्यात आली. या विशेष स्वच्छता मोहीमेकरिता 356 सफाई कर्मचारी यांची विशेष नेमणूक करण्यात आली होती. 8 पिकअप वहाने आणि 8 आरसी वाहने यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीमेत कचरा गोळा करण्यात आला.

Exit mobile version