। रोहा । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील भात लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असले तरी भाताच्या उत्पादनात मात्र वाढ होत असल्याने हमीभाव केंद्रांवर शासनाने जास्तीत जास्त भात खरेदी करावे अशी मागणी शेतकरी बांधवाकडून होत आहे.
मागील वर्षी जिल्ह्यातील भात पिकाचे हेक्टरी उत्पादन सरासरी 30 क्विंटल पेक्षा अधिक होते. रोहा तालुक्यातील भाताचे हेक्टरी उत्पादन गतवर्षी सरासरी 50 क्विंटल होते.शेतकरी संघटनांच्या सततच्या पाठपुराव्याने मागील वर्षी रोहा तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील विविध हमीभाव केंद्रांवर भाताची विक्री केली होती. यावर्षी देखील तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे.पण हमीभाव केंद्रांवर मात्र एकरी 9 क्विंटल भात खरेदी केली जात असल्याने शेतकर्यांचा शेतमाल मोठ्या प्रमाणावर घरीच ठेवावा लागत आहे. दर्जेदार खते, औषधे व बियाणे यांच्या वापरामुळे रोहा तालुक्यातील व जिल्ह्यातील भाताच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तरी शासनाने एकरी 15 क्विंटल तरी भात हमीभाव केंद्रांवर खरेदी करावी अशी मागणी होत आहे.