| रत्नागिरी | प्रतिनिधी |
सरकार कोकणी माणसाचा विश्वासघात करणार नाही. कोकणच्या विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीची आवश्यकता असल्यास ती देखील घेतली जाईल. आतापर्यंत प्रत्येक बैठकीत कोकणच्या विकासाला प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
हिंदुस्तान कोको कोला ब्रेव्हरेज कंपनी रत्नागिरीत 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. होऊ घातलेल्या प्रकल्पाच्या 700 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचं गुरवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कंपनीला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा राज्य सरकारकडून पुरवल्या जातील. कोकणचा विकास झाला, तर इथल्या तरुणांना-तरुणींना कामासाठी कुटुंब सोडून मुंबई-ठाण्यात जावं लागणार नाही. त्यामुळे आम्ही कोकणच्या विकासाला प्राधान्य देत आहोत. राज्य सरकार केवळ कोकणी माणसाला वापरून घेणार नाही. येथील कोकणी माणसाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर, शिवसेनेवर प्रेम केलं. परंतु, त्यांना काय मिळालं, असा सवाल त्यांनी केला.
कोकणच्या विकासाला हातभार लावणारे प्रकल्प येतात, तेव्हा त्याला विरोध केला जातो. काही लोक केवळ विरोध करण्याचं काम करतात, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता शिवसेनेच्या ठाकरे गटावर टीका केली. कारण नाणार आणि बारसू या प्रकल्पांना ठाकरे गटाने विरोध केला होता.
मुख्यमंत्री सर्वसमान्य असेल, तर जनतेची कामं होतात. राज्याच्या जनतेशी मी बांधील आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्री वेळ न घेता भेटू शकतो, तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील भेटलच पाहिजे. हे सरकार घरी बसणारे नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.






