धर्म संसदेच्या नावाखाली नरसंहाराची हाक

76 वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सर्वोच्च न्यायालयाच्या 76 वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण यांना पत्र लिहिले आहे. हरिद्वार आणि दिल्लीतील धार्मिक मेळाव्यांदरम्यान केलेल्या भाषणांवर या पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या नावाखाली देशाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या पत्रात म्हटले आहे. घर वापसीची हाक आणि परिषदांमधून होत असलेल्या वक्तव्यांमुळे देशातील अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती या वकिलांनी केली आहे.
हरिद्वार धर्म संसदेत द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 76 वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एनव्ही रमण यांना पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 76 वकिलांनी सरन्यायाधिशांना धर्मसंसदेच्या नावाखाली झालेल्या द्वेषपूर्ण भाषणांची दखल घेण्याची विनंती केली आहे. 17 ते 19 डिसेंबर या कालावधीत हरिद्वार येथे झालेल्या संतांच्या सभेत देशाच्या संवैधानिक मूल्यांच्या आणि जातीय सलोख्याच्या विरोधात सातत्याने भाषणे झाली. अल्पसंख्याकांच्या विरोधात शस्त्र उचलण्याचीही चर्चा होती असे वकिलांनी म्हटले आहे.
हरिद्वार आणि दिल्लीतील धार्मिक संमेलनांकडे लक्ष वेधून दुष्यंत दवे, प्रशांत भूषण आणि वृंदा ग्रोव्हर, सलमान खुर्शीद आणि पटणा उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश अंजना प्रकाश यांच्यासह नामवंत वकिलांनी स्वाक्षरी केलेले पत्र सरन्यायाधीशांना देण्यात आले आहे. ही घटना आणि भाषणे केवळ द्वेषपूर्ण भाषणे नाहीत तर संपूर्ण समुदायाच्या हत्येची खुली हाक आहे, असे या वकिलांनी म्हटले आहे. ही भाषणे आपल्या देशाची एकता आणि अखंडतेलाच गंभीर धोका निर्माण करत नाहीत तर लाखो मुस्लिम नागरिकांचे जीवन धोक्यात आणत आहेत असेही यात म्हटले आहे.

Exit mobile version