पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव
| बर्मिंगहॅम | वृत्तसंस्था |
महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजयी सलामी देत आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने सर्व विभागांत उत्कृष्ट कामगिरी करत 64 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने स्पर्धेतील पहिले दोन गुण आपल्या खात्यात जमा केले.
एजबेस्टन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर 171 धावांचे आव्हान उभे केले. यावेळी दबावाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळी करून मोठी धावसंख्या उभारली. मधल्या फळीत झालेल्या महत्त्वपूर्ण भागीदाऱ्यांमुळे भारताला मजबूत स्थिती मिळाली.
भारताकडून स्मृतीने आक्रमक खेळ करत 44 चेंडूत 28 धावा केल्या. यात तिने 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. तिला कप्तान हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी चांगली साथ दिली. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले. पाकिस्तानचा डाव 20 षटकेही पूर्ण होण्यापूर्वीच कोसळला. संपूर्ण संघ 17 षटकांत 106 धावांवर गारद झाला.
भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि आक्रमक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. दीप्ती शर्माने 4 षटकांत 10 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तर, श्रीचरणीने चार षटकांत 21 धाव देत 3 विकेट्स मिळवल्या. या विजयाला ऐतिहासिक महत्त्व असून महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सातवा विजय ठरला. तसेच एजबेस्टन मैदानावर पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने मिळवलेला हा चौथा विजय आहे.
दिप्तीची कौतुकास्पद कामगिरी
दिप्ती शर्माने या सामन्यात अविश्वसनीय कामगिरी केली, तिने तिच्या पहिल्या ओव्हरपासून विकेट घ्यायला सुरुवात केली आणि संघासाठी आजच्या सामन्यात महत्वाचे योगदान दिले. आजच्या सामन्यात तिने पाच विकेट्स घेतले, त्याचबरोबर तिला आजच्या सामन्यात सामनाविराचा पुरस्कार देखील देण्यात आला.






