वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी पर्याय
| रायगड | प्रतिनिधी |
वन्यजीव व मनुष्य यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून ग्रामस्थांना वाचविण्यासाठी राज्यातील ज्या ज्या भागात वन्य प्राण्यांचा वावर आहे, अशा वनालगतच्या बफर झोनमधील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असणारे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाच्या मार्वल या संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात ही कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश वन मंत्रालयाने दिले आहेत.
विदर्भात विविध ठिकाणी होणाऱ्या मानव व वन्य जीव संघर्ष व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जायस्वाल, आमदार परिणय फुके, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
मानव व वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण होऊ नये, अशा घटनांमध्ये मानवांचा मृत्यू होऊ नये, यासाठी ठोस पावले उचलण्यावर वन विभागाने अधिक भर दिला आहे. वना लगतच्या गावांमध्ये फेन्सिंग करणे, चर खोदणे याबरोबरच वन्य प्राणांची माहिती गावकऱ्यांना कळावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी मार्वल या संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्यासाठी लागणारा निधी देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी निधीचे नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील जंगलांमध्ये वन्य प्राण्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष होत आहेत. जंगलातील प्राणी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच अतिरिक्त प्राणी ठेवण्यासाठी खासगी प्राणीसंग्रहालयाचा विचार वन विभागाच्या विचाराधीन आहे. वनांमध्ये तृणभक्षक प्राण्यांसाठी गवत व वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून वन्यप्राणी वनाच्या बाहेर येणार नाहीत.वाघांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वनांच्या परिसरातील यापूर्वीच मंजूर रस्त्यांची दुरुस्ती परवानगीसाठी अडवणूक करू नये, अशा सूचनाही वन मंत्रालयाने दिल्या आहेत.
वन्य प्राण्यांपासून वाचण्यासाठी वनालगतच्या गावांमध्ये अर्लाम सिस्टीम असणारे एआय आधारित कॅमेरे लावण्यात येणार आहेत. वाघांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून या विषयासंदर्भात दक्षिण आफ्रिका, अमेरिका अशा देशात काय उपाय योजना केल्या जातात त्याचा अभ्यास वन विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वनालगतच्या जमिनी वन विभागाने भाडे तत्वावर घेऊन त्यावर सोलर प्रकल्प राबविण्यात येणार आहे.