सुधागडच्या 16 वाड्यांमधील युवकांचा उत्साही सहभाग
| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
पिढ्यान्पिढ्या प्रगतीच्या दिशेने धडपडणार्या कातकरी समाजाची खरी आशा आहे ती आत्ताच्या तरुण पिढीकडून. म्हणून या तरुणाईला त्यांचे स्वतःचे व सोबतच समाजाचे भान देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्थेतर्फे घेतल्या गेलेल्या दोन दिवसीय निवासी शिबिरातून केला गेला. सुधागड तालुक्यातील 16 कातकरी वाड्यांमधील युवा या प्रबोधन युवा प्रेरणा शिबिरामध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, हे युवा पहिल्यांदाच कोणत्यातरी शिबिरामध्ये सहभागी झाले होते.
पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी कातकरी समाजा समोरच्या पाच महत्त्वाच्या प्रश्नांचे फुगे फोडून अनोखे उद्घाटन केले. स्वतः आदिवासी बहुल कर्जत तालुक्यातून असलेल्या सरिता चव्हाण यांनी युवकांना मार्गदर्शन करताना कातकरी युवकांची सद्यःस्थिती व पुढे जाण्यासाठीच्या शक्य असलेल्या वाटा याबाबत मार्गदर्शन केले. पुढील काळात आपल्या समाजाला प्रगतीच्या दिशेने न्यायचे असेल तर समोर आलेली प्रत्येक संधी घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा, असे त्यांनी सांगितले.
या पहिल्या शिबिरामधील पहिल्या सत्रामध्ये पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ अमित गवळे यांनी कातकरी समाजातील युवकांसाठी उच्चशिक्षण, शिष्यवृत्ती आणि करिअरमधील संधीबाबत मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते व शेतीतज्ज्ञ संदेश कुलकर्णी यांनी ‘आदिवासी युवकांचे भान’ याविषयी मांडणी करताना आदिवासी असणे म्हणजे काय, संविधान आणि विकासाच्या रेट्याने आदिवासी समाजासमोर उभी केलेली जगण्या-मरण्याची आव्हाने व तरुणाची जबाबदारी याबाबत संवाद साधला. सध्या तरुणाईसमोर असलेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ‘प्रेम, मैत्री आणि आकर्षण’ यातील फरकाचे भान असणे. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सदस्य, शिक्षिका, प्रशिक्षक आरती नाईक यांनी युवकांसोबत विविध उपक्रम व दृक्श्राव्य माध्यमाच्या मदतीने वाढत्या वयातील शरीरविज्ञान व प्रेम आणि आकर्षण यातील मूलभूत फरक समजावून सांगितला. प्रेरणा संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयक, प्रसिध्द शाहीर व अभ्यासू वक्त्या अश्विनी कांबळे यांनी उद्घाटन सत्रामध्ये समोर आलेल्या पाच प्रमुख प्रश्नांना घेऊन शिबिरातील पाच गटांसह पथनाट्याबाबत सत्र घेतले व त्यामाध्यमातून पाच गटांनी पथनाट्य तयार करून त्याचे सादरीकरण केले.
समारोपप्रसंगी आदिवासी युवा मदत संघाचे अध्यक्ष दिनेश कातकरी यांनी युवकांना आदिवासी समाजाला पुढे न्यायचे असेल तर आत्ताच आपण निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न व्हायला हवे याबाबत रोजच्या जगण्याचे दाखले देत आपल्या ओघवत्या शैलीत प्रभावी मार्गदर्शन केले. सामाजिक सेवा केंद्र- पाटणसई- वाकण येथील उत्तम व्यवस्था असलेल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सदर शिबीर पार पडले. या केंद्राचे प्रमुख फादर फ्रान्सिस्को यांनी देखील शिबिरार्थींच्या शिस्त व समाजासाठी काही करण्याच्या धडपडीचे कौतुक केले. शेवटी उपस्थित शिबिरार्थींना ग्रुप फोटो असलेल्या सुंदर प्रमाणपत्र स्वरुपात प्रेरणादायी आठवण देण्यात आली.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या कातकरी समाजातील पहिल्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून शिबिराचा आयुष्यातील पहिला अनुभव घेताना या वेगळ्या जगाची ओळख करून दिल्याबद्दल युवकांनी महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्थेचे आभार मानले. तसेच पुढच्या शिबिराची उत्सुकता लागून राहिल्याची भावनादेखील त्यांनी व्यक्त केल्या. संस्थेचे डायरेक्टर फादर जोएल आणि प्रकल्प विस्तार अधिकारी झील गाला यांचे मार्गदर्शन व सहकार्य या शिबिराला मिळाले.
सामाजिक कार्याचा मागील 60 वर्षांचा प्रदीर्घ वारसा असलेल्या महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्थेने सुधागड तालुक्यातील 16 कातकरी वाड्यांमध्ये आदिवासी सक्षमीकरणाचा प्रयत्न विविध उपक्रमांच्या मध्यामातून सुरु केला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणून आदिवासी समाजाची आशा असलेल्या तरुणाईला स्वतःचे व समाजाचे भान देऊन खर्या अर्थाने जागृत करण्याचे काम संस्था करत आहे.
सतीश शिर्के,
प्रकल्प समन्वयक, महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्था