पोलिसांमार्फत होणार चौकशी अन कारवाई
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा शैक्षणिक हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत असलातरी शिक्षण महर्षी बनण्याच्या अट्टाहासामुळे अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहेत. जिल्ह्यातील 27 अनधिकृत शाळांची यादी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केली खरी, परंतु ठोस कारवाई नसल्याने आमचे कोण काय बिघडवतो या अविर्भावात अनेकांनी शाळा सुरूच ठेवल्या होत्या. यापैकी 10 शाळा बंद करण्यात आल्या असून पनवेल तालुक्यातील चार शाळांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असे गटशिक्षण अधिकारी यांनी पनवेल पोलिसांना दिले आहे. शाळेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी शिक्षण विभागाने केल्याने आता पोलिसांनी सावध पवित्रा घेत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्ह्यात अनेक शाळा अनधिकृत पद्धतीने, शासनमान्यता न घेता, कागदपत्रांची पूर्तता न करता चालवल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षण विभागाकडून शाळांच्या कागदपत्र तपासणी मोहीम राबविण्यात आली. यूडायस प्रणालीद्वारे शाळांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर 27 शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित शाळांवर कारवाई करण्याचा आदेश शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. अद्यापही जिल्ह्यांत नियम-निकषांची पूर्तता न करणाऱ्या 13 शाळांवरील कारवाई प्रलंबित आहे. शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या या शाळांवर कारवाईच बडगा उगारण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 27 अनधिकृत शाळांची नावे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना कळविले आहेत. यामध्ये गटशिक्षणाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार 27 पैकी 10 शाळा बंद असल्याचा अहवाल सादर केला आहे.
जिल्ह्यात अनधिकृत असणाऱ्या या शाळांच्या संस्थाचालकांना शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याच्या नोटीस दिल्या होत्या. तरी देखील शाळा बंद केल्या नसल्याने शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली होती. यामुळे गटशिक्षणाधिकारी यांनी अनधिकृत असणाऱ्या शाळांमध्ये जाऊन त्या शाळा बंद करण्याची नोटीस दिली होती. यामुळे जिल्ह्यातील 10 संस्थाचालकांनी आपल्या शाळा बंद केल्या. मात्र, अन्य 17 जणांनी अद्याप शाळा बंद केलेल्या नाहीत. या पैकी पनवेल तालुक्यातील चार शाळांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असे पत्र गटशिक्षणाधिकारी यांनी पोलिसांना दिले आहे. उर्वरित 13 शाळांना पुन्हा नोटीस दिल्या आहेत. लवकरच या शाळांवर देखील गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया शिक्षण विभाग करणार आहे.
जिल्ह्यात सुरु असणाऱ्या अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यातील अनधिकृत शाळांना शाळा बंद करण्याच्या नोटीस दिल्या होत्या. त्या शाळांच्या संस्थाचालकांना नियम आणि निकषांची पूर्तता करण्याचे कळविले होते. मात्र नियम आणि निकषांची पूर्तता न केल्याने 10 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. 17 शाळांवर कारवाई करण्याचे आदेश गट शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. यापैकी 4 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल कर्णयचे पत्र गट शिक्षणाधिकारी यांच्याम़ार्फत पोलिसांना दिले आहे.
पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद