। रसायनी । वार्ताहर ।
गणेशोत्सव व इतर सण कायद्याचे पालन करून शांततेत साजरे करा, असे आवाहन रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी केले. रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात शांतता कमिटी, पोलीस पाटील व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांची समन्वय बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यापुढे डोंगरे म्हणाले की, गणेशोत्सवात विद्युत रोषणाई करताना अपघात होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कोणत्याही बेवारस वस्तूंना हात लावू नये. फसवणूक टाळण्यासाठी एटीएम कार्डची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. कोरोना अद्याप संपला नसल्याने खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या.
गणेशोत्सव तसेच भविष्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांनी सतर्क राहावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शांतता कमिटी पदाधिकारी व सदस्य, पोलीस पाटील, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या समस्या जाणून निराकरण करण्यात आले. बैठकीला उपनिरीक्षक धनाजी काळे, खालापूर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रेय जांभळे, सुनील माळी, अरुण गायकवाड, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.