समुद्रात चक्का जामाचा इशारा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जयगड येथील बेपत्ता मच्छीमारी नौकेचा शोध अजूनही सुरूच आहे. खासगी कंपनीच्या मालवाहतूक जहाजाने धडक दिल्याने नवेद 2 नौका बुडाल्याचा मच्छीमारांचा अंदाज आहे. या प्रकरणी योग्य तो निर्णय झाला नाही तर समुद्रात चक्का जाम आंदोलन करू, असा आक्रमक पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहे.
या संदर्भात साखरीआगार येथील एका मंदिरात बैठक झाली. गुहागर तालुक्यातील पालशेत, साखरीआगार, रत्नागिरी तालुक्यातील जयगड, वरवडेसह आजूबाजूच्या परिसरातील सुमारे दोनशेहून अधिक मच्छीमार एकवटले होते. नवेद बोटीचे मालक नासीर हुसेनमियाँ संसारे यांच्यासह मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारीही उपस्थित होते.
संबंधित घटनेला आठ दिवसांहून अधिक काळ झाला आहे. बेपत्ता नौकेवरील खलाशांची माहितीही मिळत नाही. नवेद नौका बेपत्ता झाल्यानंतरच्या कालावधीत मालवाहू जहाज प्रवास करत असल्यास त्याचा तपास होणे आवश्यक आहे. या परिसरातून अनेक मच्छीमारी नौका फिरत असतात. मालवाहू नौका जा-ये करत असताना त्याची माहिती आजूबाजूच्या मच्छीमारांना वेळेत देणे आवश्यक असून त्याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे, अशी मागणीही बैठकीत झाली.
पोलिसांचा तपास सुरू असला तरीही प्रशासनाकडून किंवा खासगी कंपनीकडून कोणतीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे स्थानिक मच्छीमार आक्रमक आहेत. ती मच्छीमारी नौका कशी गायब झाली, याबाबत सखोल तपासाची मागणी होत आहे. त्यावर चार खलाशी आणि दोन तांडेल होते. एकाचा मृतदेह सापडला असून 22 वावात बेपत्ता नौकेवरील मच्छी साठवण्याचा टब मिळाला आहे.भविष्यात अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमारांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी गुहागर, जयगड येथील मच्छीमार मालवाहू नौका जाणार्‍या चॅनेलवर मच्छीमारी नौका ठेवून समुद्रात चक्का जाम करण्याची तयारी केली आहे.

Exit mobile version