। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातून वाहणार्या उल्हास नदीवरील चांदई येथील पुलाची रचना वाहन चालकांसाठी त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. या पुलाची रचना वाहनांच्या अपघाताला कारणीभुत ठरणारी अशीच करण्यात आली असल्याची तक्रार स्थानिकांमधून होत आहे. त्यामुळे तेथील दोन्ही पुल हे अपघाताचे केंद्र बिंदू ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे.
उल्हास नदीवर चांदई येथे 2010मध्ये एक पुल बांधण्यात आला. त्यावेळी एकेरी वाहतुकीसाठी बनविण्यात आलेल्या पुलावरून वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याने 2024 मध्ये जुन्या पुलाच्या बाजूला आणखी एक पुल बनविण्यात आला. परंतु, पुलाच्या बाहेर संरक्षक कठडा आणि योग्य दिशादर्शक नसल्याने येथे दर महिन्यात एकतरी अपघात होत असतात.ऑगस्ट 2023 रोजी चांधई खुर्द येथील राहणारा तरुण दीपक बबन कोळंबे यांच्या दुचाकीचा अपघात होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, फेब्रुवारी महिन्यात रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटून पुलाच्या बाजूला असलेल्या झाडीत घुसला. सुदैवाने गाडीचालक थोडक्यात बचावला. तसेच, मार्चमध्ये नेरळ येथील एका कुटुंबियांची गाडी याच ठिकाणी रस्त्याच्या खाली उतरली होती. या पुलाचा संरक्षक कठडा अर्धवट असल्याने तसेच कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर नसल्याने वाहन चालकाला या गोष्टीचा अंदाज येत नसल्याने हे अपघात होत असल्याचे निष्पन्न होत आहे.