ग्रामसेवकांवर अतिरिक्त कामाचा प्रभार

गावाच्या विकासाला खीळ
54 ग्रामपंचायतींचा भार 40 ग्रामसेवकांवर
कार्यालयातील कामात होतेय दिरंगाई

। नेरळ । वार्ताहर ।

गावाचा विकास आणि समृद्धीचा मार्ग हा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून जात असतो. अनेक विकासकामांना येथून मंजुरी मिळत, गाव सुजलाम सुफलाम होत असते. यासाठी गावाच्या स्थानिक बॉडीसह येथील ग्रामसेवक शासनाचा सदस्य म्हणून आपली भूमिका पार पाडत असतात. असे असले तरीही कर्जत तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींचा भार हा 40 ग्रामसेवकांवर येऊन पडला आहे. त्यात अनेक रिक्त पदांचा फटका हा ग्रामपंचायतींना बसत असून, कामात दिरंगाई होत आहे. तर, ग्रामसेवकांच्या मागण्यादेखील शासनाकडून प्रलंबित आहेत. नवीन ग्रामसेवक भरती होणार केव्हा, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
एक हजार च्या आतील लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक असतात. तर दीड हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. असे असले तरी रिक्त पदांचा भार या ग्रामसेवकांवर देखील पडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. कर्जत तालुक्यात 54 ग्रामपंचायती आहेत. तर जिल्ह्यात लोकसंख्या व आर्थिक दृष्टीने सर्वात मोठी असलेली नेरळ ग्रामपंचायत ही कर्जत तालुक्यातच आहे. कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून देखील ओळखला जातो. कारण तालुक्यात आदिवासी दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहेत. अशात गावाच्या समृद्धीचा मार्ग असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना अतिरिक्त भार दिल्या गेल्याने विकासाला खीळ बसल्याचे चित्र आहे. तालुक्यात 54 ग्रामपंचायत पैकी 23 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक कार्यरत आहेत. तर 17 ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. तालुक्यात 28 ग्रामसेवक व 21 ग्रामविकास अधिकार यांच्या जागा मंजूर आहेत. मात्र त्यात 6 जागा रिक्त असून, एक ग्रामसेवक निलंबित करण्यात आले असून दोघे अनधिकृत रजेवर आहेत. तर 15 ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्यावर अतिरिक्त भार टाकला असल्याचे माहितीतून स्पष्ट झाले आहे.
तेव्हा एका ग्रामसेवकांवर 2 ते 3 ग्रामपंचायतीचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. नेरळ सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार देखील प्रभारी ग्रामसेवक सांभाळत आहेत. त्यात शासकीय बैठका, प्रशिक्षण, इतर कामे आदींमुळे ग्रामपंचायतींचा कारभार हाकताना ग्रामसेवकांची दमछाक होत आहे.

शासनाच्या अनेक योजना या येत असतात. मात्र जास्त ग्रामपंचायतीचा भार यामुळे ग्रामसेवकांना वेळ अपुरा पडत आहे. एका ग्रामपंचायतीला एक वार असेल तर त्या ग्रामसेवकाला दुसर्‍या ग्रामपंचायतीचे काम होत नाही. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढतात आणि त्या पंचायत समितीपर्यंत जातात. मात्र ग्रामसेवक उपलब्ध होत नाहीत. त्यात आठवड्यातून किंवा पंधरवाड्यातून एक व्हीसी असते त्यामुळे काम करणं अवघड होतं. त्यातून गावाचा विकास कसा साधायचा हा प्रश्‍न असल्याने मोठी तारेवरची कसरत ग्रामसेवकांची होत असते.

ग्रामसेवकांची भरती करतेवेळी त्यांची शैक्षणिक अर्हता ही बदलली गेली पाहिजे. पदवी किंवा तांत्रिक पदवी असे असावे. यासोबत विस्तार अधिकारी यांची पदसंख्या वाढवली गेली पाहिजे. तेव्हा 10 ग्रामपंचायतींच्या मागे 1 विस्तार अधिकारी असला पाहिजे. -प्रवीण पेमारे, अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना कर्जत

Exit mobile version