। मुंबई । प्रतिनिधी ।
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्याकांडातील आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याच्यासह सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या आरोपींना आता अगदी राजा महाराजासारखी ट्रीटमेंट मिळायला ते आता मोकळे झाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता या आरोपींना न्यायालयाच्या देखरेखीखाली पोलिसांना त्यांची रोज चौकशी करावी लागणार आहे. या संदर्भात हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणार्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात न्यायालयीन कोठडी इतक्या लवकर दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, पीडित संतोष देखमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक व्हिडीओ आपल्याला पाठवला आहे. आपली सिस्टीम इतकी सडली आहे. पोलीस प्रशासन काम करीत नाही आहे. पोलीस प्रशासन कोणीच काम करत नाही. आरोपी कुठे गेले होते, याची माहिती सीसीटीव्हीत कैद झाल्याची ही माहिती आहे. या व्हिडिओचा उल्लेखदेखील पीसीआरमध्ये नाही, असाही त्रागा त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, पोलीसांनी तपास संपला म्हणून सांगितले. नंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. या आरोपीला मी केव्हा बेड्यात पाहीलेले नाही. ते राजा महाराजा नाहीत, गुन्हेगार आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त आहे. सर्वांना पत्र लिहून देखील त्यांचा वरदहस्त संपत नाही. पोलिसांना आणि इतरांना काही कळत नाही. सगळ्यांना सर्व माहिती आहे की हा सराईत गुंड आहे. कसे बीडला लुटले, कशी संपत्ती मिळविली हे सर्वांना माहिती आहे, असेही दमानिया म्हणाल्या आहेत.
वैद्यकीय कारणाखाली जामीन हवा
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना आता वैद्यकीय कारणाखाली जामीनावर जायचे आहे. भुजबळांना कशी जेलमध्ये असताना छातीत कळ यायची. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतील, एसीमध्ये बसवतील आणि लोक येऊन त्यांना भेटतील आणि हळूहळू मेडिकल बेल मिळण्याची भीती होती. कराडच्या बाबतीतही तसेच होणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
न्यायालयाने स्ट्राँग भूमिका घ्यावी यासाठी मी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहीले आहे. फडणवीस आणि अजित पवारांकडून न्याय मिळेल, असे वाटत नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनामा पाहिजे. ते आमदार म्हणून राहूच शकत नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसला दगडाचा न्याय देणार, ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत, भ्रष्टाचारात बुडाले आहेत.
– अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या