सोनम वांगचुक, अभिजीत दिपकेंची घेतली भेट
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारवर हल्लाबोल
| दिल्ली | प्रतिनिधी |
नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या वीस दिवसांपासून लडाखचे प्रख्यात पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी शुक्रवारी (दि. 17) रात्री दिल्लीत जाऊन उपोषणकर्ते सोनम वांगचुक तसेच आंदोलनाचे प्रमुख कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत दिपके यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात शेतकरी कामगार पक्ष खंबीरपणे सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
नीट पेपर फुटीप्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी शैक्षणिक हानी झाली आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात आले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलन पुकारले. कॉकरोच जनता पार्टी या संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देत लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक उपोषणाला बसले असून, त्यांनी 28 जूनपासून दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण सुरु केले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिल्ली गाठले. उपोषणकर्ते वांगचुक आणि आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. लोकशाही मार्गाने जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या प्रत्येक लढ्याला बळ मिळावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शेकापच्या युवा महिला नेत्या ॲड. साम्या कोरडे याही उपस्थित होत्या.
नीट पेपरफुटी हा केवळ परीक्षेतील गैरप्रकार नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर झालेला घाला आहे. सोनम वांगचुक यांचा लढा हा कोणत्याही पक्षासाठी नसून, भ्रष्ट आणि अन्यायकारक व्यवस्थेविरोधातील आहे. संसदेवर होणाऱ्या मोर्चाला घाबरून सरकारने तब्येतीचे कारण पुढे करत त्यांना आंदोलनस्थळावरून हलविण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दडपण्याचे, आंदोलन मोडून काढण्याचे आणि विरोधकांना गप्प बसविण्याचे काम सुरू आहे.ही हुकूमशाही वृत्ती लोकशाहीसाठी धोकादायक आहे. शेतकरी कामगार पक्ष शिक्षण आणि न्यायाच्या लढ्यात विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभा राहील.
– चित्रलेखा पाटील, प्रवक्त्या,
शेतकरी कामगार पक्ष
