आत्मा योजनेंतर्गत रायगडात 861 मत्स्यशेती प्रात्यक्षिके; शेततळ्यांचा होणार उत्पादक वापर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पारंपरिक शेतीवर वाढते हवामान संकट आणि उत्पादन खर्चाचा वाढता बोजा लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अतिरिक्त व शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात तब्बल 861 मत्स्यपालन प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असून, शेततळ्यांमध्ये मत्स्यशेती विकसित करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला रोहू, कटला आणि मृगळ या जातींचे एक हजार मत्स्यबीज तसेच 60 किलो मत्स्यखाद्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय मत्स्यबीज संगोपन, खाद्य व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता, रोग नियंत्रण आणि आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाबाबत तज्ज्ञांकडून प्रशिक्षण व मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
मत्स्यबीज व मत्स्यखाद्याचा पुरवठा पुणे येथील मल्हार फिश इंटरप्रायझेस आणि वीर फिश सीड हॅचरी यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. या उपक्रमामुळे वर्षभर शेततळ्यांचा प्रभावी वापर होऊन शेतकऱ्यांना शेतीबरोबरच पूरक उत्पन्नाचा स्थिर स्रोत उपलब्ध होणार आहे.
रायगडमध्ये या योजनेसाठी 861 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात 300 शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन सुरू करण्यात येणार आहे.
उरण, त्याखालोखाल उरण, रोहा या तीन तालुक्यांमध्ये शंभर ते तीनशे तळे उभारली जाणार आहेत.खालापूर,अलिबाग, पेण, पनवेल, सुधागड, माणगाव या तालुक्यांमध्ये 40 ते 50 आणि महाड, मूरूड या तालुक्यात 25 ते 28 तळे उभारली जाणार आहेत यासाठी 1,722 मत्स्यबीज हंड्यांचा पुरवठा केला जाणार आहे. कृषी विभागाच्या मते, एकात्मिक शेती पद्धतीला चालना देत ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
शेततळ्यावर दृष्टीक्षेप
उरण -300
कर्जत - 100
मुरूड - 25
अलिबाग -42
खालापूर - 40
पनवेल - 50
माणगाव- 50
पोलादपूर - 10
श्रीवर्धन - 01
महाड - 28
सुधागड- 50
तळा - 15
रोहा - 100
पेण - 50






