नागरिकांनो कचर्‍याचे विलगीकरण करा

पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आवाहन

| नवी मुंबई | वार्ताहर |
घनकचरा व्यवस्थापनातील कचर्‍याची विल्हेवाट हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून, तुर्भे एमआयडीसी परिसरातील नवी मुंबई महानगरपालिकेचा शास्त्रोक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा देशातील एक उत्तम प्रकल्प म्हणून नावाजला जातो. तथापि, स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असून, स्वच्छता प्रक्रियेत अधिकाधिक सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करूनच द्यावा, असे आवाहन पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई व पर्यावरण विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड व संबधित अधिकार्‍यांसह घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची पाहणी केली.नागरिकांकडून कचर्‍याचे निर्मितीच्याच ठिकाणी वर्गीकरण करण्यावर महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात येत आहे. हे नागरिकांकडून अपेक्षित करताना नागरिकांकडून संकलित केलेला वर्गीकृत कचरा हा संकलन आणि वाहतूक करतेवेळी एकत्र होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

वर्गीकरण न करता येणारा कचरा प्रकल्पस्थळी आल्यावर वर्गीकरण करावा लागतो हे ध्यानात घेऊन नागरिकांनी आपल्या स्तरावर कचरा वर्गीकरण न केल्यामुळे प्रकल्पस्थळी आपल्या स्वच्छताकर्मींना तो वेगळा करावा लागतो हे ध्यानात घेऊन स्वच्छतामित्रांचे काम आपल्यामुळे वाढणार नाही याची दक्षता घ्यावी व आपल्या घरातच कचरा टाकताना तो ओला व सुका अशा वेगवेगळ्या डब्यात टाकावा व स्वच्छताकर्मींना त्यांच्या कामातून काही प्रमाणात दिलासा द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

कचर्‍यातून खतनिर्मिती
ओल्या कचर्‍यावर 28 दिवसांमध्ये बायोकल्चर फवारुन विंड्रोज तयार केले जातात व त्यानंतर विविध चाळण्यांमधून प्रक्रिया करुन सेंद्रिय खत तयार होते. हे सेंद्रिय खत उद्यानांचे शहर अशी ओळख असणार्‍या नवी मुंबई शहरातील 200 हून अधिक उद्याने फुलविण्यासाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील व्यक्ती व शेतकरी उद्यानांकरिता तसेच शेतीकरिता हे खत खरेदी करुन वापरतात.

प्लास्टिकवर प्रक्रिया
या प्रकल्पस्थळी प्लास्टिकवर प्रक्रिया केली जात असून, प्लास्टिकपासून ग्रॅन्युल्स तयार केले जातात. व्यावसायिकांकडून पकडलेले प्रतिबंधात्मक प्लास्टिक व प्लास्टिकच्या पिशव्या प्रकल्पस्थळी आणल्या जाऊन त्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. नागरिकांनी एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णत: थांबवावा यासाठी अधिक प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

घनकचर्‍याची विल्हेवाट
प्रकल्पस्थळी येणार्‍या घनकचर्‍यावर डिओड्रन्ट स्प्रे केला जात असून नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढीव क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे असून त्यादृष्टीने नियोजन करावे व नवीन क्षेपणभूमीकरिता जागेची मागणी करण्याबाबत तत्परतेने कार्यवाही करावी अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

Exit mobile version