| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता रायगड जिल्ह्यात उमटू लागले असून, गॅस तुटवड्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेला हॉटेल व कॉटेज व्यवसाय अडचणीत आला आहे. कमर्शिअल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याची माहिती समोर येत असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वेळेत गॅस उपलब्ध न झाल्यास अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटन व्यवसायिकांकडून केली जात आहे.
रायगड हा पर्यटनावर आधारित जिल्हा म्हणून ओळखला जातो. अलिबागसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मिळणाऱ्या घरगुती जेवणांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र, सध्या आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कमर्शिअल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारित असलेला हॉटेल आणि कॉटेज व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्यास हॉटेल बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक नागरिकांच्या रोजगारावरही होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पर्यटन व्यवसाय टिकून राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी अनेक व्यावसायिकांकडून केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक गडकिल्ले आणि लेणी पर्यटकांना कायमच आकर्षित करतात. त्यामुळे अलिबागसह नागाव, रेवदंडा, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगर आणि दिघी या समुद्रकिनारी भागांमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मुंबई, पुणे तसेच इतर शहरांतील नागरिक शांतता आणि विश्रांती मिळावी यासाठी सुट्टीच्या काळात आवर्जून रायगड जिल्ह्याला भेट देतात. दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक रायगड जिल्ह्यात येत असल्याचे सांगितले जाते. पर्यटनामुळे हॉटेल, कॉटेज आणि अन्य संबंधित व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. विशेष म्हणजे, रायगडमध्ये येणारे पर्यटक घरगुती जेवणांचा आस्वाद घेण्याला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात असतात. मात्र, सध्या पर्यटनावर आधारित असलेला हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आखाती देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे परिणाम आता रायगड जिल्ह्यातही दिसू लागले आहेत. गॅसचा तुटवडा जाणवू लागला असून पूर्वी पंधरा दिवसांनी मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर आता तीस दिवसांनी मिळत असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर कमर्शिअल गॅस सिलेंडर मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. काही ठिकाणी कमर्शिअल सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्याचीही माहिती पुढे येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल आणि कॉटेज व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असली तरी परीक्षा संपल्यानंतर पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यावर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कमर्शिअल गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. सध्या कमर्शिअल गॅस सिलिंडर मिळत नसल्याने पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर पदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलिंडर कुठून आणायचा, असा प्रश्न हॉटेल आणि पर्यटन व्यावसायिकांसमोर उभा राहणार आहे.







