| पेण | प्रतिनिधी |
पोलीस भरती ही पूर्ण पारदर्शक होत असते. येथे वशिलेबाजीला थारा नाही. परंतु, बर्याच वेळा भरतीत भाग घेणार्या विद्यार्थ्यांना चुकीचे मार्गदर्शन केले जाते व ओळखीवर अथवा वशिल्यावर पोलीस भरती होते असे सांगून उमेदवारांचे लक्ष विचलित केले जाते, असे मत अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी व्यक्त केले. पेण नगरपालिका मैदानावर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले.
त्यांनी असे ही सांगितले की, भरती दरम्यान उमेदवारांकडून छोट्या-छोट्या चुका होत असतात आणि त्या चुकांमुळेच कधी कधी अपयश पदरी येते. हे अपयश पदरी येऊ नये म्हणूनच या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. जेणेकरुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी पोलीस भरतीत सहभाग घेऊन भविष्यात देश सेवेसाठी योगदान द्यावे, असेही शेवटी त्यांनी सांगितले.
या शिबिरामध्ये जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, मैदानी खेळ यांचे प्रात्यक्षिके करण्यात आली व विद्यार्थ्यांकडून करुनदेखील घेण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल, दादर पोलीस निरीक्षक गोविंद पाटील तसेच सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ पाटील यांनी मेहनत घेतली.